नवी दिल्ली: गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेशच्या अनेक जिल्ह्यात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. भोपाल आणि विदिशामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर, सिवनी-वैनगंगा नदीमध्ये तीन जण वाहून गेली आहेत. यामधील एकाला वाचवण्यात यश आले आहे तर दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
तसेच येत्या 3 ते 4 दिवसात मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे. भोपालसह मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मंडला जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. तर पावसामुळे सिहोरमध्ये पार्वती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
सिवनी येथे गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी कमरे इतके पाणी साचले आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसहित अनेक भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी पंचशीलनगर, नया बसेरा, राजीवनगर आणि अन्य परिसरांमधील घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हवलवण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेशमधील अनेक धरण भरली आहेत. बरगी धरणाचे 21 दरवाजे खोलण्यात आले आहेत. धरणाचे पाणी नर्मदा नदीमध्ये सोडल्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सिवनी जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेला संजय सरोवर धरणांचे 5 दरवाजे खोलण्यात आले आहेत. पूराचे पाणी भोपाळ-सागर मार्गावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.