वाढत्या वाहतूक दंडावर मंत्र्यांची प्रतिक्रीया
मुंबई: वाहतूक नियमांचा भंग केल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात सध्या दंड आकारला जात आहे. त्या विषयी नागरीकांमध्ये मोठाच रोष आहे. त्याविषयी पत्रकारांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मीही एकदा वेगाने गाडी चालवल्याबद्दल दंड भरला आहे असे नमूद करीत मूळ विषयावर भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले की, बांद्रा वरळी सीलिंक मध्ये वेगाने गाडी चालवल्याबद्दल आपल्या वाहनाला दंड झाला होता असे ते म्हणाले.
मोदी सरकारला शंभर वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने सरकारच्या कामांची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांना वाढलेल्या वाहतूक दंडाच्या रकमेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर गडकरी म्हणाले की मोटार वाहतूक कायद्यात बदल करून मोदी सरकारने मोठी कामगीरी बजावली आहे.
ते म्हणाले की नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दंड आकारला की त्याच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार कमी होईल असा आमचा विश्वास आहे. ट्रिपल तलाक विरोधातील कायदा मंजुर करणे, आणि त्यातून महिलांना न्याय देणे ही आमच्या सरकारची मोठी कामगिरी आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. काश्मीरसाठीचे 370 कलम रद्द करणे हाही आमच्या सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. आपल्या मंत्रालयाच्यावतीने जम्मू काश्मीरात रस्ते विकासाचे साठ हजार कोटी रूपयांचे प्रकल्प सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.