हजारो कार्यकर्ते सहभागी; एकसंध देशासाठी भाजपमध्ये प्रवेश : उदयनराजे
वाई – भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे वाई विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, माजी आमदार मदन भोसले यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुपारी महागणपतीची आरती करून रॅलीची सुरुवात झाली. रॅलीत माजी खासदार गजानन बाबर, अनिल कदम, डी. एम. बावळेकर, विक्रम पावसकर, श्रीनिवास घाडगे, अशोक गायकवाड, बकाजीराव पाटील, डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, राजेंद्र नेवसे, सुनील माने, विजयसिंह नायकवडी, बापूसाहेब शिंदे, विजय भिलारे, सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर, श्रीमती विजयाताई भोसले, विकास शिंदे, विक्रम वाघ, रतनसिंह शिंदे व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. “एकच वादा मदनदादा’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. अनेकांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, मदन भोसले, यांचे कटआऊटस् हातात घेतले होते. चित्रा टॉकीज, किसन वीर चौक, मोठा पूल, पोलीस स्टेशनमार्गे रॅली नवीन प्रशासकीय इमारतीत आली. त्यानंतर निवडणूक कार्यालयात जाऊन मदन भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजी मंडई येथे सभा झाली. त्यावेळी उदयनराजे तेथे आले. ते म्हणाले, लोकशाहीत मतदार राजा असतो. निवडणुकीत चांगल्या लोकांच्या पाठीशी रहा. मला चालता येत नाही, हे खरे आहे. कारण तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडून योग्य वेळी आमच्यावर संस्कार झाले नाहीत. मला बोलता येत नाही, हेही खरे आहे. मला खोटे बोलताच येत नाही. मी जे बोलतो तेच करतो. एकसंध देशासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मी दोन दिवसात विस्तृत पत्रकार परिषद घेऊन बोलेन. आत्ताच बोललो तर संबंधित आपला अर्ज काढून घेतील. मी एवढ्या सहजासहजी त्यांना सोडणार नाही. प्लीज, म्हणून मला तीन महिन्यांपूर्वी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. प्रत्येक वेळी मी निवडून आलो की, उदयनराजे आपल्यामुळे निवडून आले, असे ते म्हणायचे. आता पाहू कोण कोणामुळे निवडून येतो ते. मदन भोसले म्हणाले, चाळीस वर्षे जनतेची सेवा करताना माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, हे मान्य करतो. त्याची राजकीय किंमत मोजली आहे; परंतु मी सतत जनहिताचे काम केले आहे.
माझी चूक माफ करून पुन्हा संधी द्या. त्यांनी दहा वर्षात मतदारसंघात काय विकासकामे केली हे एका व्यासपीठावर येऊन सांगावे. मी भाजपमध्ये गेल्यापासून 500 कोटींची कामे मंजूर करून आणली आहेत. उदयनराजे पुन्हा वाईत येतील, ते केंद्रीय मंत्री म्हणूनच. विरोधक माझा चॉकलेट म्हणून उल्लेख करतात. माझा चेहरा चांगला आहे, त्यात माझा काय दोष? गजानन बाबर, अशोक गायकवाड, शिवसेनेचे यशवंत घाडगे, विजय कुंभारदरे, दीपक ननावरे, सौ. सुधा साबळे, अनुप सुर्यवंशी, हिंदुराव कांबळे, गणेश उतेकर, तुळशीदास पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. काशिनाथ शेलार यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र धनवे यांनी आभार मानले.