रमेश चव्हाण
परलोकवासी सत्यशोधक प्रार्थनासमाजिस्ट दलितमित्र रा. ना. चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक लेखसंग्रहाचे हे 39वे संकलन (पुस्तक) आहे. प्रार्थनासमाजाचे अध्वर्यू न्या. रानडे व डॉ. रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थनासमाजाचा तत्त्वविचार प्रगल्भ केला. महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वातील आद्यसुधारकात दोघांचाही समावेश होतो. त्यांच्यातील अद्वैत फार महत्त्वाचे आहे. 19व्या शतकातील धर्म व समाजसुधारणेवर या दोघांचा प्रभाव आढळतो.
ज्ञानेश्वर-तुकाराम याप्रमाणे रानडे-भांडारकर हा एक समास आहे. या पुस्तकात या दोघांवरील रा. ना. चव्हाण यांचे 5 लेख घेतले आहेत. या दोघांच्या कार्यातील विविध पैलू स्पष्ट करताना रा. ना. चव्हाण यांनी व्यापक दृष्टीने मूल्यमापन केले आहे. त्यातून या दोघांच्या कार्याचे सामाजिक, राजकीय व धार्मिक अंगाने विश्लेषण तौलनिक पद्धतीने निबंध स्वरूपात येथे मांडले आहे. हे लेख त्यांनी नवभारत (वाई), मराठी विश्वकोष (वाई), रयत शिक्षण पत्रिका (सातारा) आणि अस्मितादर्श (औरंगाबाद) अशा प्रतिष्ठित माध्यमांमध्ये लिहिले होते. लेखांचा लेखनकाळ (1976 ते 1990) हा रा. ना. चव्हाण यांच्या आयुष्यातील परिपक्व कालखंड होता.
लेखांद्वारे रा. ना. चव्हाण यांनी रानडे-भांडारकरांच्या विचार कार्याचे मर्म विशद केले आहे. रानांच्या तौलनिक मांडणीमुळे साम्यस्थळे, परस्पर-पूरकता, भेद आणि मर्यादा यांचा वेध घेत रानडे, फुले व आंबेडकर यांच्या संदर्भात केलेले भाष्य वाचकांच्या विचारास चालना देते. प्रस्तुत पुस्तक दोन व्यक्तींविषयी असले तरी सुमारे शतकभराच्या महाराष्ट्राविषयीचे विचारमंथन लेखांतून प्रगट झाले आहे. रानडे-भांडारकर या दोघांची भावी बदलाविषयीची दृष्टी किती व्यापक होती याचा परिचय या पुस्तकातून होतो.
अतिशय डोळसपणे रानडे, फुले, भांडारकर, टिळक यांच्या कृतींकडे पाहून स्वच्छ नजरेतून त्यांच्या कार्याची महती लेखांतून मांडली आहे. रानांनी निकोप, निरामय भूमिकेतून रानडे-भांडारकरांच्या कार्याचे केलेले विश्लेषण आजच्या पिढीने समजून घेण्याची गरज आहे. पुस्तकास जोडलेल्या 7 परिशिष्टांमुळे सदर पुस्तकाचे मूल्य अधिकच वाढले आहे.
या पुस्तकास इतिहासाचे तसेच 19व्या शतकाचे मर्मग्राही अभ्यासक प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी समर्पक अशी प्रास्तावना दिली आहे.
रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांचे हे 39 वे “अक्षरश्रद्धांजली पुष्प’ आहे. पुणे प्रार्थनासमाजास 149 वर्षे पूर्ण होत आहेत व तो 150व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या घटनेचे औचित्य साधून हे पुस्तक पुणे प्रार्थनासमाजाने प्रकाशित केले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे वाङ्मयीन स्मारक झाले आहे. विवेक व न्याय यावर अधिष्ठित असलेली समाजरचना अस्तित्वात आल्याखेरीज खरे राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य यांचा उपभोग अशक्य आहे, हे रानडे यांचे सूत्र उपेक्षिले गेले. त्याची महती समाजास पुन्हा सांगण्याची गरज असल्याने आजच्या काळात हे पुस्तक महत्त्वाचे आहे.