केजरीवाल, सिसोदियांवरील आरोप हटवले
नवी दिल्ली – दिल्लीत रेलभवनमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील आरोप आज दिल्लीतील सत्र न्यायालयाने हटवले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह “आप’चे आमदार सोमनाथ भारती आणि राखी बिर्ला आणि अन्य काही जणांना आरोपातून मुक्त केले.
जानेवारी 2014 मध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या आमदारांनी रेल भवन येथे धरणे आंदोलन केले होते. या परिसरात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
जुलै महिन्यात या प्रकरणी विशेष न्यायालयाने या सर्वांच्याविरोधात विविध कलमांखाली आरोप निश्चित केले होते. त्यामध्ये बेकायदेशीरपणे जमाव जमवणे आणि कायदेभंगाच्या आरोपांचा समावेश होता. सकृतदर्शनी गंभीर गुन्ह्याचा संशय असल्याचा निष्कर्श काढण्याइतपत पुराव उपलब्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.