कराड – कराड तालुक्यात लंपी स्कीन त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यातील वाघेरी येथे खिलार बैल, तर डफळवाडी (पाल) येथे संकरीत गाईच्या मृत्यूनंतर आता पाल येथे एका संकरीत गाईची मृत्यू झाला आहे. त्यामुळे लंपीचा तालुक्यातील हा तिसरा बळी ठरला असून पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वाघेरी येथे लंपीचा जिल्ह्यातील पहिला बळी गेला होता. वाघेरीत खिलार बैलाला लंपीचा संसर्ग झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर पाल विभागातील डफळवाडी येथे लंपीने शनिवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास संकरीत (एचएफ) गाईचा मृत्यू झाला होता. तसेच पालमध्ये दोन जनावरांना लंपीचा प्रदुभाव झाल्याने त्यांच्यावर उपचार होते. परंतु, त्यातील एका संकरीत (एचएफ) गाईचा सोमवारी मृत्यू झाला आहे.
कराड तालुक्यातील बाधित क्षेत्रापासून 5 किमी अंतरावर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली असून त्याठिकाणी वेगाने लंपी स्कीन प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 9 हजारांपेक्षा जास्त जनावरांना लसीकरण करण्यात आले असून बाधित जनावरांवर उपचार सुरु असल्याची माहिती माहिती कराड तालुका लघु पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी दिली.
तसेच जिल्ह्यातील लंपी स्कीन त्वचारोगाचा संसर्ग, प्रादुर्भाव आणि प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी सोमवारी सातारा तालुक्यातील बाधित क्षेतास भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच ते आज मंगळवारी कराड तालुक्यात भेट देणार असून येथील परिस्थितीचाही आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते सांगली जिल्ह्याकडे रवाना होतील, अशीही माहिती डॉ. बोर्डे यांनी दिली आहे.
दरम्यान, तालुक्यातील वारुंजी येथे पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी स्कीन प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. तसेच जनावरांच्या अंगावर माश्या बसू नयेत, लंपी स्कीनचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून कराड नगरपालिका प्रशासनाकडून मंगळवार पेठ व वाखाण परिसरातील जनावरांच्या गोठ्यात कीटकनाशकाची फवारणी केली. त्याचबरोबर काही शेतकरी कडूलिंबाच्या पाल्याचा लेपही जनावरांना लावत असून त्या वासाने जनावरांच्या अंगावर माश्या बसण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
लसीकरण मोहिमेस गती
कराड तालुक्यात गुरुवारी लंपी स्कीनचा तिसरा बळी गेल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पशुपालकांनी न घाबरता जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता ठेवावी, विविध प्राथमिक उपाययोजना करावी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, बाधित जनावरांवर तात्काळ उपचार सुरु करावेत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 9 हजार पेक्षा जास्त जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरण मोहिमेस आणखी गती देण्यात आल्याचेही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.