पिंपरी – प्रवासा दरम्यान रिक्षात 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग विसरलेल्या महिलेला पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हरवलेले दागिने परत मिळणार आहेत. रिक्षाचा नंबरही माहीत नसताना पोलिसांनी तिचे दागिने शोधून काढले. गीता उचगावकर (वय-39,रा.काळेवाडी पुणे) ह्या काळेवाडी पाचपीर चौक ते काळेवाडी फाटा असा रिक्षा प्रवास करत असताना 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग विसरल्या. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दोन पथकांची यासाठी नेमणूक केली.
पोलिसांनी रिक्षाची शोध मोहीम सुरु केली. महिलेला रिक्षाचा नंबरही माहीत नव्हता आणि शहरात हजारोंच्या संख्येने रिक्षा असल्यामुळे पोलिसांना तपासाच्या कक्षा खूप रुंदावव्या लागल्या. सुमारे 200 रिक्षाचालकांची चौकशी केल्यानंतर पोलीस त्या चालकापर्यंत पोहचले. त्या रिक्षा चालकाने दागिने असलेली बॅग व 4 हजार 300 रुपये पोलिसांकडे जमा केले. याबाबत पोलिसांनी फोनवर फिर्यादी महिलेला माहिती देताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही व आनंदाश्रू अनावर झाले. महिला सध्या कोल्हापूरला असल्याने लवकरच वरिष्ठाच्या हस्ते ऐवज परत देण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर, कर्मचारी बिभीषण कन्हेकर, सुरज सुतार, मयूर जाधव, प्रशांत गिलबिले यांचा सहभाग होता.