शिरूर -शिरूर आगारातून एसटी बसेच्या फेऱ्या सुरू करून 18 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत आगार रोज पंधरा हजार रुपये तोट्यात चालविले जात आहे. सध्या पुणे-नगर रस्त्यावर केवळ तीन फेऱ्यात रोज हा तोटा होत आहे. लॉकडाऊनपासून रोज आठ लाख रुपये तोटा होत आहे. गेल्या तीन महिन्यांत आकडेवारीनुसार शिरूर आगाराला साडेसात कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे हे आगार व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येक दिवस शिरूर आगार रोजचा आठ लाख रुपये तोटा सहन करीत आहे. त्यात राज्य शासनाने 15 जूनपासून एसटी बस सेवा सुरू केली आहे. त्यानुसार आगाराने पहिल्या टप्प्यात विविध भागात सात फेऱ्या सुरू केल्या होत्या. परंतु या सर्व फेऱ्या तोट्यात जात होत्या. प्रवासी एसटीत बसण्यास किंवा घराबाहेर पडण्याच्या मानसिकतेत नाहीत.
त्यामुळे आगारास चार फेऱ्या रद्द करून केवळ शिरूर- पुणे मार्गावरच तीन फेऱ्या सुरू ठेवाव्या लागल्या आहेत. यात पंधरा हजार रुपयांचा तोटा होत आहे. तीन फेऱ्यात पंधरा हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. अगोदरच आठ लाख रुपये तोटा रोजचा होत असताना त्यात आणखी दरररोजची पंधरा हजार रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे पुढील काळात तीनही फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
शिरूर आगारातून 15 जूनपासून सात वेगवेगळ्या भागात एसटीची सेवा सुरू केली होती. परंतु सर्व फेऱ्या तोट्यात जात असल्याने चार फेऱ्या बंद केल्या आहेत. केवळ शिरूर- पुणे मार्गावर वाघोलीपर्यंत फेऱ्या सुरू आहेत. ही फेरी प्रत्येकी पाच हजार रुपये तोट्यात जात आहे. उत्पन्नात वाढ झाली नाही तर या फेऱ्याही पुढील काळात बंद कराव्या लागतील.
– महेंद्र माघाडे, आगार प्रमुख शिरूर