मुंबई :राज्यातील राजकारणावर महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राजकारण दिवसेंदिवस गलिच्छ होत चाललं आहे. राजकीय नेते कसे रंग बदलतात ते जनतेने पाहिलं पाहिजे असे म्हणत त्यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे. एवढंच नाही तर जनता शांत आहे आणि हम करे सो कायदा अशी स्थिती आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी,” जे काही राजकारण सध्या राज्यात सुरु आहे ते भयंकर आहे. पुढे बघा आणखी किती ते गलिच्छ होतं. हम करे सो कायदा अशी स्थिती आहे. अजूनही निवडणुका लागत नाही. कुणीही काही बोलत नाही, काहीही करत नाही. मोबाइल फोन नावाचं जे माध्यम आलं आहे ना त्यावर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात.
पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचे. आत्ता तसं घडत नाही. मोबाईलवर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. हे मोबाईलवरचे मेसेज राजकारणी बघत नाहीत. सरकार बघतं तेव्हा लोक शांत असतात कारण त्यांचा राग व्यक्त करुन झालेला असतो. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत हे वठणीवर येणार नाहीत” असेही म्हटले आहे.
राजकारणात जे काही चाललं आहे ते पाहता मी कुणाबरोबर जाईन असं मला वाटत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. रत्नागिरीतल्या दापोलीत राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही आणि उद्धव ठाकरेंबरोबर जाणार का असा प्रश्नही राज ठाकरेना विचारण्यात आला. त्यावर मी १० ते १५ दिवसात मेळावा घेणार आहे त्यामध्ये मी आपली भूमिका मांडणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.