IND vs WI 1st Test Day 2 : कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांच्या शतकांमुळे भारताने डॉमिनिका कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे.
गुरुवारी (13 जुलै) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा Team India च्या पहिल्या डावात दोन गडी बाद 312 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाकडे 162 धावांची आघाडी झाली आहे.
यशस्वी जैस्वाल 143* तर विराट कोहली 36* धावांवर खेळत आहेत. आता तिसर्या दिवशी यशस्वी आपल्या डावाचे द्विशतकात रूपांतर करण्यासाठी उतरेल. तर कोहलीकङून सुध्दा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात एकही गडी न गमावता 80 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी जयस्वाल 40 तर, रोहित शर्मा 30 धावांवर खेळत होते. यावेळी भारत 70 धावांनी पिछाडीवर होता.
त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ पुढे सुरू झाल्यावर याच जोडीने वेस्ट इंडिजच्या सगळ्याच गोलंदाजांचा समाचार घेतला. सावध परंतु धोका पत्करून जयस्वाल व रोहितने फटकेबाजीही केली.
यशस्वीने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून अनेक विक्रम केले. त्याचवेळी रोहित शर्माने गेल्या काही डावातील निराशा मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत शतक केल्यानंतर मोठी खेळी खेळली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी इतिहासात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता विरोधी संघाविरुद्ध पहिल्या डावात इतकी मोठी आघाडी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माने कारकिर्दीतील 10वे शतक झळकावले. शतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने 221 चेंडूत 103 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. अॅलिक एथेनेझने रोहितला बाद केले. त्याच्यानंतर फलंदाजीसाठी क्रीझवर आलेल्या शुभमन गिललाही विशेष काही करता आले नाही आणि तो सहा धावा करून वॅरिकनचा बळी ठरला.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर यशस्वीला माजी कर्णधार विराट कोहलीची साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 205 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. यशस्वीने नाबाद 143 धावांच्या खेळीत 350 चेंडूंचा सामना केला आहे. त्याचवेळी कोहलीने 96 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या. यशस्वीच्या बॅटमधून 14 चौकार निघाले आहेत. कोहलीने आपल्या खेळीत एक चौकार लगावला आहे.
यशस्वीची विक्रमी खेळी…
पदार्पणातच शतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा 17वा फलंदाज ठरला आहे. त्याआधी श्रेयस अय्यरने कसोटीत पदार्पण करताना भारतासाठी शतक झळकावले होते. त्याने 2021 मध्ये कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध 105 धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ हे भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे पहिले भारतीय खेळाडू होते. त्यांंनी 1933 मध्ये इंग्लंडविरुद्ध 118 धावा केल्या होत्या.
तिसरा भारतीय सलामीवीर…
यशस्वीबद्दल बोलायचे झाले तर पदार्पणातच शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय सलामीवीर आहे. शिखर धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये आणि पृथ्वी शॉने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये अशी कामगिरी केली होती.
तसेच यशस्वीने परदेशी भूमीवर पदार्पण करताना पहिल्याच कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. एवढेच नाही तर वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने 2013 मध्ये कोलकात्यात 177 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पृथ्वी शॉने 2013 मध्ये राजकोटमध्ये 134 धावा केल्या होत्या.