कोयनानगर (वार्ताहर) – सहा दशकांपासून रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी कोयना धरणग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून अनेक आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतली आहे. गतवर्षी कोयनानगर येथे केलेल्या ठिय्या आंदोलनात येऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एका महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
एक महिना संपला तरी ही बैठक झाली नसल्याने धरणग्रस्त पुन्हा आक्रमक झाले. धरणग्रस्तांनी एकत्र येऊन पालकमंत्री देसाई यांच्या मरळी येथील निवासस्थानी लॉंग मार्च काढायला सुरवात केली आहे.
तीन मंदिरापासुन जवळच असलेल्या रासाटी येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकला आहे. याठिकाणी आंदोलक मुक्कामी असणार असून शुक्रवारी सकाळी पालकमंत्री देसाई यांच्या कार्यालयावर हा लॉंग मार्च जाणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
यावेळी चैतन्य दळवी, सचिन कदम, महेश शेलार, श्रीपती माने, रामचंद्र कदम, सीताराम पवार, पी. डी. लाड, विनायक शेलार, शिवाजी कांबळे, साधू सपकाळ, दादू थोरवडे, कमल कदम, जगाबाई कदम, अनुसया कदम आदी प्रमुख व कोयना धरणग्रस्त मोठ्या प्रमाणात या लॉंगमार्च मध्ये सहभागी आहेत.
प्राधिकरणाची बैठक मंगळवारी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक ५ मार्च रोजी मंत्रालयात आयोजित केली आहे. त्याचबरोबर कोयना धरणग्रस्तांच्या १०० टक्के विकसनशील पुनर्वसनासाठी विभागीय आयुक्तांनी १ मार्च रोजी बैठक आयोजित केली असल्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट केले आहे.