पिंपरी – पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या महायुतीबरोबर आपण लढणार आहोत. तर महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. स्थानिक नेत्यांना वाटले की आपण स्वबळावर निवडणुका लढायच्या किंवा युतीत लढायचा हा सर्व तुमचा निर्णय असेल, असे रोखठोक मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.25) चिंचवड येथे व्यक्त केले.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, विनोद नढे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार पुढे बोलताना म्हणाले, आपण भाजप आणि शिवसेनेबरोबर गेलो असलो तरी निवडणुकांसाठी कॉंग्रेसमध्ये जसे जागा वाटप केले होते. त्यानुसार जागा वाटप केले जाणार आहे. पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या महायुतीबरोबर आपण लढणार आहोत. महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसह आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. स्थानिक नेत्यांना वाटले की आपण स्वबळावर निवडणुका लढायच्या किंवा युतीत लढायचा हा सर्व तुमचा निर्णय असणार आहे.
चंद्रयान-3 मुळे भारताची जगात मान उंचावली असल्याचे सांगत पवार पुढे म्हणावे, देशातील 65 टक्के जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानते. त्यांना मोदीच पंतप्रधान म्हणून हवे आहेत. देश चालविणारा कारभारी चांगला असेल तर देशाचा सर्वांगींन विकास होत असतो. गेल्या नऊ वर्षांच्या काळात महामार्ग झाले. विविध भागात रेल्वे सुरू झाल्या. देशात उच्च दर्जाचे विमानतळ होत असल्याचेही पवार म्हणाले.
आम्ही विचारधारा सोडली नाही
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कधी शिवसेनेबरोबर जाईल याचा कधी विचार केला होता का? पण आम्ही शिवसेनेसोबत अडीच वर्ष सरकार चालवले. मात्र, मध्यंतरी राज्यात काही राजकीय स्थित्यंतरे आली. आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला होता. मात्र, काहींना मध्येच वेगळे वाटले. मी सत्तेसाठी भाजपबरोबर गेलो नाही. राज्याचा, शहरांचा विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. भाजपबरोबर सत्तेत गेलो असलो तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी सांप्रदाय, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार आम्ही मानतो. सर्वधर्म समभाव ही आमची भूमिका असून आम्ही विचारधारा सोडली नसल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.