कोलकता – चालू वर्षी डिसेंबरमध्ये किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी जानेवारीत लोकसभा निवडणूक घेण्याचे पाऊल भाजप उचलू शकतो, असे भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुन्हा केले. भाजपने प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर्स बुक केले असल्याचा दावाही त्यांनी केला.
केंद्रात भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यास देशाला एकतंत्री आणि अनियंत्रित राजवटीला सामोरे जावे लागेल. भारत द्वेषाचा देश बनेल, असा इशारा ममतांनी दिला. त्या तृणमूल कॉंग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या सभेत बोलत होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी इतर पक्षांना हेलिकॉप्टर्स उपलब्ध होऊ नयेत या उद्देशातून ते भाजपने आधीच बुक केले असल्याचे त्या म्हणाल्या.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांत चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर, लोकसभा निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये अपेक्षित आहे.
आता ममतांनी पुन्हा केलेल्या भाकितामुळे पाच राज्यांबरोबरच लोकसभेचाही राजकीय महासंग्राम होणार का, या मुद्द्यावरून चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार लोकसभा निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तो अवधी मोठा नसल्याने सर्वच पक्ष आतापासूनच मोर्चेबांधणी करू लागल्याचे दिसून येत आहे.