नवी दिल्ली – तांत्रिक कारणामुळे आज ब्रिटनमधील विमानसेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना वेगवेगळ्या विमानतळांवर ताटकळत राहिले होते. ब्रिटनमध्ये येणारी आणि ब्रिटनमधून अन्य देशांमध्ये जाणारी सर्व विमाने विमानतळांवरच थांबून राहिली होती. तातडीच्या कामांसाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्तापसहन करावा लागला. ब्रिटनच्या विमान वाहतुक व्यवस्थेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानतळावरून कोणत्याही विमानांना उड्डाण करण्याचे किंवा उतरण्याचे संदेश दिले जाऊ शकले नाहीत. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी हवाई वाहतुक नियंत्रण स्थगित ठेवणे भाग पडले होते, असे ब्रिटनच्या “नॅसनल एअर ट्राफिक सर्व्हिसेस’ अर्थात “नाट्स’ने म्हटले होते. मात्र विमान वाहतुकीशी संबंधित नेमकी कोणती तांत्रिक समस्या आली आहे आणि ही समस्या नक्की किती काळापर्यंत कायम राहणार आहे, हे मात्र स्पष्ट केले गेले नाही.
ब्रिटनमधील उन्हाळ्यात अखेरच्या “वीक एन्ड’ला बॅंकांना सुटी होती. त्यानिमित्ताने सुटी घालवण्यासाठी अनेकजण फिरायला गेले होते. या सुटीवरून परत येत असणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. त्यामुळे हवाई वाहतुकीवर खूप जास्त ताण असलेल्या दिवशीच ही तांत्रिक समस्या उद्भवली होती.
या तांत्रिक कारणामुले विमानांच्या “ऑटोमॅटिक प्रोसेस फ्लाईट प्लॅन्स’च्या क्षमतेला निष्क्रीय केले गेले होते. ही समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी कार्यरत असल्याचे “नाट्स’च्यावतीने सांगितले गेले. जोपर्यंत इंजिनिअरकडून ही समस्या पूर्णपणे सोडवली जात नाही तोपर्यंत ही यंत्रणा “मॅन्युअली’ हाताळली जाणार आहे. त्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणात विमानांची वाहतुक होणे अपेक्षित आहे, तितक्या प्रमाणात ही वाहतूक होणार नाही, असेही सांगण्यात आले.
प्रत्येक विमानाच्यासुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र त्यामुळे होत असलेल्या विलंबाने प्रवाशांची जी गैरसोय होते आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ब्रिटनची हवाई हद्द बंद केली गेलेली नाही,असे “नाट्स’ने म्हटले आहे.
ब्रिटनमधील अनेक विमानतळे आणि रायनएअर, इझीजेट, विझ एअर, लोगनायर आणि एर लिंगस या विमान कंपन्यांनी सर्व प्रवाशांना उड्डाणांना उशीर किंवा रद्दकेली जाण्याचा इशारा दिला आहे, तसेच तांत्रिक समस्यांमुळे ग्राहकांनी त्यांच्या एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचे आवाहन लंडन ल्युटन, स्टॅनस्टेड, हिथ्रो आणि गॅटविक विमानतळांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.