Varsha Gaikwad | Lok Sabha Election 2024 – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचे जागावाटप करण्यात आले आहे. पण यामुळे काँग्रेसच्या गोटात मात्र नाराजी पसरली असल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे.
मविआचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्या थेट दिल्ली गाठत हायकमांडची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
वर्षा गायकवाड यांच्यासोबत आमदार अमिन पटेल आणि आमदार अस्लम शेख हे देखील दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील जागावाटप करताना विश्वासात घेतले नाही, असे म्हटले.
ज्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या. पण मविआच्या जागावाटपावेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला.
तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी त्या दिल्लीला जाणार, असे सांगण्यात येत होते.
त्यामुळे याचबाबत चर्चा करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि अस्लम शेख यांच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? याबाबत सध्या तरी अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.