मुंबई – महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. मात्र, जागावाटपावरुन अजूनही मविआत विशेषत: काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू आहे. मिलिंद देवरा यांच्यासारखे नेते आधीच सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यातच मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आपली नाराजी आता उघड उघड बोलून दाखवली आहे. मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे अशी अपेक्षा होती. मुंबईतील जागावाटप झाले तेव्हा काँग्रेसला विचारात घेतले गले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 Maharashtra congress Varsha Gaikwad’s displeasure regarding seat allocation)
कमीत कमी दोन ते तीन जागा मिळाव्यात –
मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबईमध्ये मागील काळात आम्ही पाच जागा लढायचो आणि राष्ट्रवादी एक सीट लढायची. सध्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही देखील समान सहभागी आहोत. जागावाटपांनंतर मी काही प्रमाणात नाराज आहे. यासंदर्भात मी पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांनादेखील सांगितले आहे, आम्हाला कमीत कमी दोन ते तीन जागा मिळाव्यात. आमचा काहीही निर्णय असेल तो पक्ष श्रेष्ठींना कळवू पक्षात कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा असतात. पक्षाने काही निर्णय घेतल्यानंतर त्या स्वीकाराव्या लागतात.
पक्षाने जो निर्णय घेतला आहे, तो आम्हाला मान्य –
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, घोसाळकर यांचे काही लोक मला भेटून गेले. दक्षिण मध्य मुंबईत आमची ताकद आहे. जागा अदला बदली केली तर आम्ही स्वागत करू. मी किती बैठकांना उपस्थित होते हे सर्वांना माहीत आहे. मुंबई जागा वाटपासंदर्भात आणखी काही चांगले करता आले असते. पक्षाने जो निर्णय घेतला आहे, तो आम्हाला मान्य आहे. परंतु, वस्तुस्थिती आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.