पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि लोकसभा निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघाच्या उमेदवार मीसा भारती यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. जर निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते तुरूंगात असतील असा इशारा त्यांनी दिला आहे. (Controversy due to Misa Bharti’s statements ‘…then Prime Minister Narendra Modi will be in jail’)
पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच विरोधकांच्या इंडिया आघाडीवर मुस्लिमांच्या लांगुलचालनाचा आरोप केला होता. त्याबाबत विचारल्यावर मीसा म्हणाल्या इंडिया आघाडी ३० लाख लोकांना रोजगार देते आहे. यातही त्यांना तुष्टीकरण दिसते आहे का? जर आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत, एमएसपी लागू करण्याबाबत बोलत असू तर हा तुष्टीकरणाचा प्रकार आहे का? इलेक्टोरल बॉंडबाबत उत्तर कोण देणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
त्या पुढे म्हणाल्या की पंतप्रधान जेंव्हा येतात तेंव्हा आमच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. केवढा मोठा भ्रष्टाचार आहे त्यांना माहिती आहे का? जर आघाडीचे सरकार आले तर केवळ पंतप्रधानच नाही तर भाजपचे जेवढे नेते आहेत ते सगळे तुरूंगात जातील.
शिपायांच्या वसाहतीत राहणारे आज महालांमध्ये राहतात – भाजपने मीसा भारती यांना दिल्ले उत्तर
राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या मीसा भारती यांनी पंतप्रधानांवर टीका करत भाजप नेत्यांना इशारा दिल्यानंतर भाजपकडूनही त्यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. जे लोक घाबरलेले होते त्यांनाही आज कंठ फुटला आहे असे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्ह आणि भाजपचे अन्य नेते रामकृपाल यादव यांनीही राष्ट्रीय जनता दलावर हल्लबोल केला.
जे लोक अगोदर शिपायांसाठी असलेल्या क्वार्टर्समध्ये राहत होते ते आज महालांमध्ये राहत आहेत अशा शब्दांत त्यांनी मीसा यांना लालूंच्या पाश्र्वभूमीची आठवण करून दिली. तर विरोधी पक्षांचा प्रचाराचा दर्जा इतका घसरला आहे की ते पंतप्रधानांना तुरूंगात पाठवण्याची भाषा बोलू लागले आहे अशा शब्दांत भाजप नेते विनोद तावडे यांनी मीसा यांच्यावर टीका केली.
भ्रष्टाचाऱ्यांना तुरूंगात पाठवणार आहे की नाही हे देशाला जाणून घ्यायचे आहे. तर येथे विरोधी पक्षांचा प्रचार इतपत घसरला आहे की कोणी तुरूंगात पाठवण्याची भाषा बोलू लागले आहे तर कोणी मृत्यूचीही भाषा बोलते आहे. रामकृपाल यादव म्हणाले तुरूंगात पाठवण्याची भाषा करणाऱ्यांनी अगोदर स्वत:ची काळजी घ्यावी आणि स्वत:ला वाचवावे.
मी ४० वर्षांपासून राजकारणात आहे. सहा वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार होतो. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तुरूंगात पाठवून दाखवावे. प्रतिज्ञापत्रात जे म्हटले आहे त्याबाहेर आमच्याकडे कोणती संपत्ती नाही. मोदींवर त्यांनी टीका करताना स्वत:ची काळजी घ्यावी.