सातारा -करोना महामारी सुरु झाल्यापासून तीन महिने लॉकडाऊन होता. सर्व काही बंद असल्याने असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. करोनापासून बचावासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दि. 17 जुलै ते 26 जुलै असा लॉकडाऊन पुन्हा केला होता. या लॉकडाऊनचे काटेकोर पालन नागरिकांनी केले. त्यामुळे आता नव्याने सुरु केलेल्या लॉकडाऊनचा जिल्हा प्रशासनाने फेरविचार करावा आणि लॉकडाऊनपूर्वी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्व दुकाने सुरु होती, तशीच शिथिलता या लॉकडाऊनमध्ये द्यावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, करोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोना साथ सुरु झाली तेव्हापासून जिल्ह्यात सुमारे तीन महिने सर्व काही बंद होते. यामुळे मोलमजुरी, रोजंदारी करणाऱ्या गोरगरीब लोकांचे अतोनात हाल झाले. लॉकडाऊननंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सातारकर नागरिकांसह जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन केला.
याचे काटेकोर पालन जनतेने केले. प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणाऱ्या जनतेवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन लादला. सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. वेळेची मर्यादा असल्याने गर्दी होत असून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. करोनाला रोखण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी सर्व दुकाने सुरु असणे अत्यावश्यक आहे आणि ही काळाची गरज आहे.
त्यामुळे बाजारपेठेची, व्यापाऱ्यांची, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. या लॉकडाऊनमध्ये सकाळी 9 ते 5 अशा वेळेची शिथिलता देऊन सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. तरच नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि खास करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. गर्दी टाळण्यासाठी आणि जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नमूद केले आहे.