नवी दिल्ली : कोरोनाला हरवण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन संदर्भातील मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये आज चर्चा झाली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत विनंती केली मोदींकडे केली आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रातील आकडा हा सर्वाधिक आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मास्क घालून चर्चेत सहभागी झाल्याचे दिसले. सध्याच्या घडीला मास्क वापरणे अनिवार्य आहे, असा संदेशच त्यांनी यातून दिला. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचा केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असा विश्वास मोदींनी दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहतूक व्यवस्थेवरील निर्बंध आणखी काही दिवस कायम ठेवण्याची सूचना केली. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा मांडल्यानंतर आता लॉकडाऊनचा कालावधी किती वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.