मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनामुळे 40 जणांचा बळी गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर यात आहे. तर तब्बल 1 हजार 035 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा 7 हजार 447 वर पोहचला आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर वृत्त माध्यमांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,’ हा ग्राफ आटोक्यात आणावा लागेल. कम्युनिटी ट्रान्समिशन होत असेल तर आपल्यासाठी ती धोक्याची घंटा आहे, पाश्चिमात्य देशांच्या मनाने आपल्याकडे करोना बाधितांची संख्या कमी असली तरी धोका खूप मोठा आहे. कारण आपल्याला लोकसंख्येची कल्पना आहे. आरोग्य, स्वच्छतेची परिस्थिती सर्वानाच माहित आहे” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “साक्षरतेची परिस्थिती काय आहे हे आपण पाहतोय, माहितीच्या आधारावर करोना विरोधातील हे युद्ध आपल्याला जिंकाव लागेल. तबलिगीच्या कार्यक्रमाला कोणी परवानगी दिली, यात मला पडायचं नाही पण त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे” हे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ते पुढे म्हणाले,“नांदेडच्या गुरुद्वारामध्ये दोन ते चार हजार लोक अडकले आहेत. एकाला करोनाची लागण झाली की, ती वेगाने पसरणार. हा बायलॉजिकल टाइमबॉम्ब आहे. गेल्या १०० वर्षात अशी साथ पसरली नव्हती” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.