मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? असा प्रश्न विचारून, हे “भ्रमित ठाकरे’ सरकार आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे भ्रमित ठाकरे सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे. काय ते एकदा ठरवा अर्थचक्र फिरवायचे का दोन किमी मध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या, जनतेचा संभ्रम दूर करा, असे ट्विट त्यांनी केले.
दरम्यान, राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत अनलॉकिंगचे नियम कायम ठेवताना, घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये, असे म्हटले आहे. त्यावरून सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहे.