नवी दिल्ली: कोरोनाने जगात थैमान घातले असून भारतात सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या कोरोना विषाणूची रोकथाम करण्यासाठी व या विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली 75 शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर, मुंबई आणि पुण्यात अगोदरच अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थान, पंजाबमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीन लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतातही त्याच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 341 लोकांमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे.
आज (रविवारी) दुपारपर्यंत 26 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. व्हायरसमुळे 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व राज्यातील शाळा, कार्यालये व इतर संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गटात एकत्र येऊ नयेत यासाठी सरकार सूचना देत आहेत, परंतु या सूचना असूनही संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (दुसर्या टप्प्यातील) चालू आहे. आता संसर्गाची झपाट्याने वाढणारी घटना लक्षात घेता सरकार अधिवेशन तहकूब करण्याबाबत सोमवारी निर्णय घेऊ शकेल अशी माहिती मिळाली आहे.