मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे ग्रामपंचायतीअंतर्गत स्थानिक सोळा मजुरांना मनरेगा योजनेअंतर्गत काम मिळाले असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ-निगडाळे ग्रामपंचायतीअंतर्गत तेरूंगण येथे मनरेगामार्फत वन विभागाच्या जागेत जमिनीवर समतल चर खोदण्याचे काम सुरू आहे. दिवसाला सात फूट लांब व दीड फूट खोल चर खोदून घेतला जात आहे.
नंतर या चराच्या कडेने वनविभाग रोपांची लागवड करणार आहे. यामुळे साहजिकच अभयारण्य क्षेत्रात वनसंपदा वाढीस लागून वन्यप्राण्यांना याचा फायदा होणार आहे. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करूनोदेण्याच्या या योजनेमुळे नागरिकांना कामासाठी कुठेही बाहेर न जाता त्यांना त्यांच्या गावाच्या आसपासच काम मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे. या कामासाठी मजुरांना त्यांच्या होणाऱ्या कामानुसार प्रतिदिवस 238 रुपये मजुरी दिली जात असून, ती दर पंधरा दिवसांनी मजुरांच्या थेट बॅंक खात्यात जमा केली जात आहे. यामुळे स्थानिक गरीब-गरजू आदिवासी बांधवांना हाताला काम मिळाले असल्याने ते समाधानी आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेले मजूर, नागरिक, छोटे शेतकरी, कामगार या सर्वांच्याच रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा काळात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आदिवासी भागातील जनतेच्या कामी आली आहे. या योजनेतील काम गेल्या एक महिन्यांपासून चालू असल्याची माहिती कोंढवळ-निगडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक चिमटे, ग्रामसेवक अशोक शेवाळे, वनरक्षक रुस्तुम माहोरे यांनी दिली.