मनीषा सुतार
सध्या नदीकाठच्या वाळूचोरीवर बंदी आली आहे. दारूचे अनेक धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा हमखास दुसरा स्रोत म्हणून सावकारीच्या धंद्याकडे पाहिले जात आहे. लोकांना बॅंकांकडून लवकर कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेक गरजू लोक नाईलाजाने खासगी सावकारांची पायरी चढत आहेत. बरेचसे अडाणी, अशिक्षित लोक खासगी सावकारांकडून मोठ्या उमेदीने धंद्यासाठी, शेतीसाठी कर्ज काढतात. परंतु ते नंतर फसवले जातात.
देशात सावकारशाहीविरोधात महात्मा जोतिराव फुले यांनी आंदोलने केली होती, वृत्तपत्रांतून आवाज उठवला होता. त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथात त्यांनी सावकारशाहीचे वाढलेले प्रस्थ आणि त्यांच्या ओझ्याखाली पिचलेला शेतकरी यांची तत्कालीन परीस्थिती मांडली आहे. त्यांनी तत्कालीन समाजजीवन आपल्या लेखणीद्वारे मांडले. विशेष म्हणजे आजही तशीच परिस्थिती आहे.
शेतकरी, सर्वसामान्य माणूस आजही सावकारशाहीने त्रस्त झाला आहे. खासगी सावकार गावोगावी मोकाट फिरत आहेत, लोकांना लुबाडत आहेत. कमी श्रमात जास्त नफा मिळवून देणारा सावकारीचा धंदा महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. कोल्हापूरमधील सोळा खासगी सावकारांच्या घरावर सहकार विभागाने नुकतेच पोलीस बंदोबस्तात छापे टाकले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून सावकारांचे धाबे दणाणले.
राज्यातील सावकारशाहीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खासगी सावकार कर्ज दिल्यानंतर तारण म्हणून शेतकऱ्याची शेतजमीन गहाण ठेवून घेतात. परंतु सावकाराच्या कर्जाचे चक्रवाढव्याज भरता भरता शेतकऱ्याची दमछाक होते. ते व्याज भरता न आल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जखडणारे हे सावकारी पाश राज्य सरकारने खरोखरच बंद करावेत, ही अपेक्षा आहे. कोल्हापूर येथे सहकार विभागाने एका सावकाराच्या आणि त्याच्या मुलाच्या घरांवर छापे टाकले. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये बॅंक पासबुक, कराराची कागदपत्रे, संपत्तीचे दस्त अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. त्याशिवाय कोरे स्टॅम्पपेपर आणि सह्या केलेले चेक मिळाल्याची चर्चा आहे. खासगी सावकारांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली तरी सहकार खात्याकडून कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत होती.
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या पश्चिम महाराष्ट्रातील शहरांत खासगी सावकारी बोकाळली असून त्यामुळे गुंडशाही वाढली आहे. खासगी सावकारी हा देशाला लागलेला शाप आहे. सावकारीमुळे जनता पिचली गेली आहे. एक तर जुलैपासून अगदी नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र मोठा पाऊस पडला. त्यानंतर पिके कुजून खराब झाली. शेतकऱ्याने पिकवलेला शेतमाल बाजारात आणण्यापूर्वीच खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्नाचे दुसरे साधन उरलेले नाही. गत सरकारने शेतकऱ्याना कर्जमाफीसाठी जाचक अटी टाकल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित झाले. शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घेतले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने घेतलेले पीक कुजून गेले. त्यामुळे खासगी सावकाराकडून पुन्हा कर्ज काढण्याशिवाय पर्याय नव्हता. खासगी सावकारांना वेळेवर कर्जाचा हप्ता दिला नाही तर ते कर्जदारांना त्रास देतात, मानसिक छळ करतात. त्यामुळे सर्वसामान्य माणूस विफल होत आहे. मनाने खचत आहे. राज्य सरकारने खासगी सावकारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही खासगी सावकारीचे प्रस्थ वाढत आहे. खासगी सावकार आपला काळा पैसा गुंतवून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडे लोकांकडून दिलेली कर्ज वसूल करण्यासाठी मोठे मनुष्यबळ असते. यात अनेक गुंडांना हाताशी धरून दिलेल्या कर्जाचे व्याज वसूल करता येते. प्रसंगी धमकी देणे, मारहाण करणे, मानसिक छळ करणे, दबाव आणणे, पाळत ठेवणे, व्यक्तीच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणे अशा बाबी केल्या जातात. काही सावकार तर 5 ते 10 टक्क्यांनी लोकांना कर्ज देत असून त्याच्यामागे मोठी लॉबी असते. यात काही राजकारणी, काळे धंदेवाले यांचा पैसा गुंतला असण्याची शक्यता आहे. हे सावकार लोकांच्या व्याजाच्या पैशांवर गब्बर झाले असून सरकारचा महसूल बुडवतात.
खासगी सावकारीचे प्रस्थ वाढण्याचे कारण म्हणजे आता बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून महागाईही वाढत आहे. तसेच उद्योगधंदे बंद होत आहेत. याचा परिणाम राज्यातील बहुतांश नागरिकांवर होत आहे. लोक गरजेपोटी खासगी सावकारांकडून कर्ज काढतात. परंतु नंतर ते त्यांच्या कचाट्यात अडकतात. राज्यात बऱ्याचशा आत्महत्या होण्याचे कारण म्हणजे खासगी सावकारी आहे. कारण खासगी सावकारीवर कोणाचा अंकुश नाही. पोलिसात गेले तर तिथे या खासगी सावकारांची चौकशी होईलच अशी खात्री नसते. झाली तर या सावकारांचे वरपर्यंत हात पोहोचलेले असतात. न्यायालयात गेले तर सावकारांनी कर्ज दिल्याची पावती नसते. कर्जाच्या बदल्यात एखाद्याची जमीन लिहून घेतली जाते. पैसे द्या आणि जमीन सोडवा, असे खासगी सावकारांकडून सांगितले जाते. पैसे अदा केले तरी लिहून दिलेली जमीन पुन्हा कर्जदाराच्या नावावर होईल याची खात्री नसते. खासगी सावकारांकडून कर्ज काढण्याचा मामला म्हणजे “चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला’ असा आहे.
राज्य सरकारने गरजू लोकांना कर्ज उपलब्ध करून दिली तर खासगी सावकारशाही फोफावणार नाही. मात्र, सध्या सुरु असलेल्या सावकारशाहीचे प्रस्थ चिरडून टाकणे महत्त्वाचे वाटते.