सातारा – शासनाच्या सर्व विभागातील सोयीसुविधांचा लाभ जरूर घ्या. पण, माणूस म्हणून जगताना एखाद्या मोठ्या वृक्षाप्रमाणे जीवन जगा. वृक्ष कधीही दुजाभाव करत नाही, वृक्ष सावली देताना जात धर्म विचारत नाही, असे मत प्रसिध्द चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
परळी खोऱ्याच्या डोंगरमाथ्यावर दुर्गम ठिकाणी वसलेल्या जळकेवाडी (वरची) परिसरातील नागरिकांना शासकीय सेवासुविधांचा लाभ व माहिती मिळण्यासाठी तहसीलदार आशा होळकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने महाराजस्व अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सयाजी शिंदे बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य कमलताई जाधव, पंचायत समिती सदस्य सौ. विद्या देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एखादा सज्जन आहे की दुर्जन आहे हेही न विचारता तो वृक्ष निर्मळपणे निर्व्याजपणे आपली सावली, ऑक्सिजन, फळे जे काही देता येईल ते देत असतो. शहरातल्या लोकांपेक्षा खेड्यातील लोक हुशार मनाने, चांगल्या शरीराने धडधाकट आहात. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. तहसीलदार आशा होळकर म्हणाल्या, “शासन आपल्या दारी अंतर्गत महाराजस्व अभियानात लोकांनी उत्स्फूर्तपणे आपणास काय हवे याची माहिती संबंधित विभागाला द्यावी. शासनाच्या कोणकोणत्या योजना आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सूची प्राप्त करून घ्यावी.
शासन व जनता यांच्यातील अंतर कमी होण्याकरता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमास जळकेवाडी, धावली, वांजळवाडी, भांबावली, तांबी, अलवडी, बांबरवाडी, वारसवाडी, गणेशवाडी, केळवली, सांडवली गावातील लाभार्थ्यांनी लाभ घेतला. महाराजस्व अभियान कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, गाव कामगार तलाठी, मंडळाधिकारी, पुरवठा पर्यवेक्षक, तहसीलदार यांनी परिश्रम घेतले.