भोसरी – पुणे-नाशिक महामार्गालगत लांडेवाडी येथे असलेल्या लिंकरोडवर दिवसभर खासगी ट्रॅव्हल्सची अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पीएमपीची वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याने प्राणांतिक अपघात झाल्यानंतरच महापालिका व वाहतूक पोलीस या अतिक्रमणाकडे लक्ष देणार का? असा सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गालगत लांडेवाडी येथे भोसरीगावच्या दगडी प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यालगत राजमाता जिजाऊ महाविद्यालय, दत्तमंदीर तर समोरच्या बाजूला अण्णासाहेब मगर सहकारी बॅंक व अनेक सोसायट्यादेखील आहे. तर लांडेवाडीकडून नाशिक महामार्गावर येण्या-जाण्याकरिता हा जवळचा रस्ता आहे. भोसरीच्या बाजूने लांडेवाडीकडे जाण्यासाठी या रस्त्यासाठी असलेला रस्ता दुभाजक अपघातामुळे बंद करण्यात आला आहे. मात्र, लांडेवाडीकडून नाशिक महामार्गावर येण्यासाठी पीएमपीसह बहुतांशी वाहने या रस्त्याचा वापर केला जातो.
भोसरीतून विदर्भ, मराठवाड्यासह परराज्यात जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सची सुविधा उपलब्ध आहे. विदर्भ, मराठवाड्यातील उन्हाचा तडाखा पाहता, या मार्गावर बहुतांशी रात्रीच्यावेळी प्रवास केला जातो. त्यामुळे दिवसभर ही अवजड वाहने कुठे उभी करायची? असा प्रश्न निर्माण झाला होता. तर महामार्गालगत अनेकांनी पार्कींग स्टॅण्डच्या माध्यमातून हा प्रश्न काही अंशी सोडविला, मात्र, करोना प्रादूर्भावानंतर या पार्कींग स्टॅण्डमध्ये कमी मात्र सर्व्हिस रोडवर अधिक वाहने उभी राहत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी याठिकाणी असलेल्या गॅस एजन्सीची सिलींडर भरलेले ट्रक उभे असायचे. मात्र आता खासगी ट्रॅव्हल्सची वाहने उभी राहत असल्याने, यामध्ये भर पडत आहे.
मोठी आर्थिक उलाढाल
नाशिक महामार्गालगतच्या भोसरी-लांडेवाडी परिसरात अनेक ठिकाणी पार्किंगचा व्यवसाय फोफावला आहे. त्यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र, आता अनेक वाहनांनी आपला मोर्चा लांडेवाडीच्या लिंकरोडकडे वळविला आहे. मात्र, हा रस्ता महापालिकचा असला, तरीदेखील याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी शुल्क वसूल केले जात असल्याची परिसरात चर्चा आहे.
स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी
दिवसभर लिंकवर उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहनांमुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लांडेवाडीहून नाशिक महामार्गाकडे जाताना उजव्या लेनवर ही वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर जीव मुठीत घेऊन, स्थानिकांना ये-जा करावी लागत आहे. तर रात्रीदेखील ही वाहने कमी संख्येने रस्त्यावरच असल्याने वाहनचालकांनादेखल याचा त्रास सहन करावा लागत आहे.