नगर -लवकरच लिंकरोड पुलाचे काम पूर्ण करुन पुल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, तसेच आजपासून पुलाच्या कामाबरोबरच तात्पुरत्या स्वरुपाच्या बायपास रस्त्याचे काम करुन वाहतुकीस खुला केला जाणार आहे, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले.
पुलाचे व शेजारील तात्पुरत्या स्वरुपातील बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केली, यावेळी कोतकर बोलत होते.
कोतकर म्हणाले, केडगाव उपनगराच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी आ. संग्राम जगताप यांनी लिंकरोडच्या कामासाठी दीड कोटी रुपये व त्यावरील खोकर नदीवरील पुलासाठी 1 कोटी रुपयांचा निधी, असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करुन आणला व कामाला सुरुवातही झाली.
रस्त्याचे व पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आणि करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे प्रशासनाने 24 मार्चला काम बंद केले. कामगारही निघून गेले. त्यानंतर पावसाळा सुरु झाल्यामुळे कामाला व्यत्यय येत होता. पुलाजवळील तात्पुरत्या स्वरुपाचा बायपास तयार करण्यात आला. परंतु मोठ्या पावसामुळे हा पुलही दोन-तीन वेळा वाहून गेला.
रात्री- अपरात्री पावसाच्या पुरामुळे कुठलेही अनूचित घटना घडू नये, यासाठी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होते. मात्र, आता लवकरच लिंकरोड पुलाचे काम पूर्ण करुन पुल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, तसेच आजपासून पुलाच्या कामाबरोबरच तात्पुरत्या स्वरुपाच्या बायपास रस्त्याचे काम करुन वाहतुकीस खुला केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष वैभव ढाकणे, संभाजी पवार, भूषण गुंड, माऊली जाधव, सागर सातपुते, भरत गारुडकर, सागर भांबरे, सोनू जगताप, अमित खामकर, दीपक खेडकर, अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, मयूर भापकर, संतोष शेटे, भाऊ शेटे, रावसाहेब शेटे, समशून खान आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. विधाते म्हणाले, लिंकरोडच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला. भोसले म्हणाले, लॉकडाऊनमुळे काम बंद करण्याचे आदेश प्रशानाने दिल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचा स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, अन्यथा पावसाळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असती.