नवी दिल्ली – भारतीय वंशाचे ऋषी सुनक येत्या 28 तारखेला ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. सुनक यांच्यामुळे भारतात सध्या साजऱ्या होत असलेल्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. सगळीकडे या बातमीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे जल्लोष केला जातो आहे. एकीकडे हे सगळे होत असताना काही मंडळी विशेषत: नामांकीत मंडळी हे सगळे इतिहासाशी जोडून आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही यावर भाष्य करत इतिहासातील एका घटनेचा संदर्भ दिला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये महिंद्रा म्हणतात की, 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की सगळे भारतीय नेते स्तरहीन आणि नैतिकदृष्ट्या कमजोर असतील. आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना आपण एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला ब्रिटनचा पंतप्रधान होताना पाहत आहोत. आयुष्य खरेच सुंदर आहे.
In 1947 on the cusp of Indian Independence, Winston Churchill supposedly said “…all Indian leaders will be of low calibre & men of straw.” Today, during the 75th year of our Independence, we’re poised to see a man of Indian origin anointed as PM of the UK. Life is beautiful…
— anand mahindra (@anandmahindra) October 24, 2022
दुसरे जागतिक महायुद्ध (1940 ते 1945) आणि भारताचे स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान होते. भारतासह सगळ्याच आशियाई लोकांना ते तुच्छ समजायचे. 1943 मध्ये भारतात बंगालमध्ये महाभयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा तेथील नागरिकांना भुकेने मरण्यासाठी सोडून दिल्याचा आरोप चर्चिल यांच्यावर केला जातो. त्यावेळी भारताला अन्नधान्याच जी निर्यात केली जात होती ती चर्चिल यांनी थांबवल होती.
तेव्हा ते म्हणाले होते की, भारताला कितीही मदत केली तरी ती अपुरीच आहे. कारण ते सशासारखे केवळ मुले जन्माला घालण्याचेच काम करतात. महात्मा गांधी यांनाही चर्चिल अर्धनग्न फकीर म्हणाले होते, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.