पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा भाजपबरोबर जाणार असल्याची शक्यता राजदचे नेते व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. त्यांनी म्हटले आहे की आमची महाआघाडी मजबूत असून राज्यात मोकामा आणि गोपालगंज येथील विधानसभेच्या दोन्ही पोटनिवडणुका महाआघाडी प्रचंड बहुमताने जिंकेल.
नितीशकुमार हे राजदशी काडीमोड घेऊन पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी हा दावा केला. ते म्हणाले की आम्ही बिहार मधून भाजपला सत्तेतून घालवले या प्रयोगाचे देशभर स्वागत झाले आहे. या प्रयोगाने ज्यांचे नुकसान झाले आहे ते लोक या संबंधात जाणिवपुर्वक अफवा पसरवत आहेत. पण तसे काहीही होणार नाही याची त्यांनाही कल्पना आहे.