कोरेगाव भीमा -करोनामुळे लागू झालेलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा रविवारी (दि. 17) संपून चौथे लॉकडाऊन सुरू झाले तरी सलून दुकाने उघडण्याबाबत काही निर्णय होत नसल्याने सलून मालकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किमान दोन तास तरी दुकान उघडण्याची अटी व शर्तींवर परवानगी द्यावी, अशी आर्त हाक कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील नाभिक
समाजाने व सलून दुकानदारांनी दिली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सलून दुकान बंद आहे. त्यामुळे दोन महिन्यांचे दुकानाचे भाडे, दुकानातील सौंदर्य प्रसाधनांचा माल खराब होण्याची भीती, कामगारांना या कठीण काळात सांभाळण्यासाठी द्यावी लागणारी आगाऊ रक्कम यामुळे सलून मालकांची आर्थिक ओढाताण होत आहे. तसेच हाताला काम नसल्याने व आर्थिक चणचण जाणवत असल्याने सलून कामगार आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचताना दिसत आहेत. नाभिक समाज हा गरीब व हातावर पोट असलेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कमवेल तेव्हा खाईल असा समाज आहे. शिल्लक नसतेच यामुळे या समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
दुकान मालकांचा मनुष्यबळावर किमान 50 तर 30 टक्के जागेचे भाडे, ईएमआय, प्रॉडक्ट्स, वीज, फोन, पाणी, दुरुस्ती यावर खर्च होत असतो. व्यवसाय बंद असल्याने घरभाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, किराणा बॅंकेचे हप्ते कसे द्यायचे असा प्रश्न पडला आहे. आताच्या परिस्थितीमुळे छोटी-छोटी दुकाने कायमची बंद होतील की काय, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढण्यात भरच पडणार आहे.
शासनाने घातलेले सर्व निर्बंध कोरेगाव भीमा येथील सलून व्यावसायिकांनी पाळले आहेत; पण आता त्यांच्या व कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे, त्यामुळे शासनाने या सलून व्यावसायिक व कामगारांची आर्थिक व मानसिक समस्या समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी धावले पाहिजे त्यांना महिन्याला किमान 5 हजारांची आर्थिक मदत लवकरात लवकर दिली गेली पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या जगण्याच्या संघर्षाची तीव्रता कमी होईल.
– अनिल काशीद,
सल्लागार, शिवसेना, पुणे जिल्हा