नगर -वीर सावरकरांनी देशाला स्वतंत्र्य मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये हिंदूंना जागे करत संघटन होण्यासाठी केलेले काम खूप मोठे आहे. हिंदूंनी एकत्र यावे यासाठी त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या केली. इंग्रजांनी उभ्या केलेल्या जाती पतीच्या भिंती पाडून फक्त हिंदू म्हणूनच सर्वांनी एकत्र यावे हे वीर सावरकर यांचे अंतिम ध्येय होते. आजही हिंदूंना एकत्र येत संघटित होणे नितांत अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
नगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त सावेडीच्या माउली सभागृहात “सावरकर विचार दर्शन’ या विषयावर शरद पोंक्षे यांनी व्याख्यान दिले. यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर जोशी, सचिव मंदार मुळे, शहराध्यक्ष राजकुमार जोशी, शहर उपाध्यक्ष सुबोध कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शरद पोंक्षे पुढे म्हणाले, विज्ञानवादी असलेले वीर सावरकर प्रखर देशभक्त होते. धर्मग्रंथ अपडेट होत नाहीत पण विज्ञान कायम अपडेट होते. म्हणून विज्ञान हाच धर्मग्रंथ व्हावा असा विचार मांडून सावरकर यांनी वेद, पुराण, कुराण व बायबल हे पूजनीय ग्रंथ आहेत पण आचरणीय नाही असा विचार मांडला. सावरकरांच्या विचारांनी समाज शहाणा, सुसंस्कृत व विज्ञाननिष्ठ होईल ते राजकीय लोकांना परवडणार नाही. म्हणून सावरकरांचे विचार आजपर्यंत दाबले गेले.
हिंदू हेच राष्ट्रीयत्व, हिंदू हेच जीवन यासाठी जगणारे सावरकर यांना जावून आज 55 वर्ष झाली. तरी सातत्याने त्यांच्याविषयी जाणीवपूर्वक अपशब्द व अपमानकारक वक्तव्य केले जात आहे. हे थांबण्यासाठी सावरकरांचे राष्ट्रभक्तीचे व विज्ञानवादी विचार नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशी व्याख्याने झाली पाहिजेत. प्रास्ताविक अध्यक्ष किशोर जोशी यांनी केले. स्नेहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.