डी.के.वैद्य
अकोले -अकोले नगरपंचायतसाठी विक्रमी मतदान झाले. त्यामुळे या मतदानाचा नेमका फायदा कोणाला होणार? याची चर्चा रंगत असतानाच सर्वपक्षियांनी आम्हाला बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. दरम्यान काल एका मताचे मोल 3 हजार रुपयांपासून 9 हजार रुपयांपर्यंत पोहचले, अशी कुजबुज सुरू आहे.
मागील वेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत दिले होते. पण पिचड पिता-पुत्रांनी पक्ष बदलला आणि सर्वच्या सर्व नगरसेवक अपवाद वगळता हे भाजपामध्ये चालते झाले होते. यावेळेस भाजपने अजेंडा राबवून आपल्या संघर्षाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे परत जनता त्यांच्याकडे सत्ता देणार? की आमदार लहामटे यांच्यावर विसंबून त्यांनाच अकोल्याच्या विकासाची सूत्रे सोपविणार हे 19 जानेवारीला मतपेटीतून दिसून येणार आहे. 17 पैकी 13 प्रभागांची निवडणूक झाली असून उरलेल्या 4 प्रभागांची निवडणूक प्रक्रिया ही 1 जानेवारीनंतर सुरू होणार असल्याने अकोल्याचे वातावरण निवडणूकमय राहणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे समन्वयक भानुदास तिकांडे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 10 आणि शिवसेनेचे 3 उमेदवार आम्ही उभे केले होते. हे सर्व 13 उमेदवार निवडून येणारच. आणि नगर पंचायतीची सत्ताही आम्हालाच मिळणार, अशा प्रकारचा ठदावा त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले की,पिचड पिता-पुत्र, कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, शिवाजी राजे धुमाळ, वसंतराव मनकर आणि इतर सहकारी मित्रांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आम्ही 12 प्रभागात उमेदवार उभे केले होते. सर्व उमेदवार निवडून येणार आहेत.
आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, शिवाजीराजांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटकमध्ये झाली. त्याचा आम्ही निषेध व्यक्त केला. भाजपा यामध्ये कुठे दिसली नाही. हे त्यांचे महाराजांवरील प्रेम समजायचे का? असा टोला लगावला.
निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आल्या शिवाय राहणार नाहीत, असेही स्पष्ट केले.कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव नेहे म्हणाले, वाढीव मतांची टक्केवारीही कॉंग्रेसला लाभदायक ठरणार आहे. या निवडणुकीत आम्हीच बहुमताने निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.