नगर -खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात वाहतूक नियोजनांचा फज्जा उडाला असून, कांदा लिलावाच्या दिवशी वाहतूक कोंडीने शेतकरी व व्यापारी बेजार झाले. बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
करोनानंतर नेप्ती उपबाजार समितीत दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. अनेक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असून, नेप्ती कांदा विभागात फक्त विक्रीसाठी एकच सेल हॉल उपलब्ध आहे. या सेल हॉलच्या क्षमतेच्या पाचपट अधिक कांदा बाजारात दाखल होत आहे. नाईलाजाने आलेला कांदा पार्किंग व रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उतरवावा लागत आहे.
सोमवार, गुरुवारी व शनिवारी लिलावाच्या दिवशी उपबाजार समितीमध्ये एकाचवेळी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आनलेले वाहन व ग्राहकाने घेतलेला कांदा भरून बाहेर पडणारे वाहनामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. तासन्तास शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना वाहतूक कोंडीत अडकत आहेत.
या शेतकरी व व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे बाजार समितीकडून दुर्लक्ष होत असून, या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकरी, ग्राहक व व्यापाऱ्यांना बसत आहे. कांद्यासाठी उपबाजार समितीमध्ये आणखी दोन ते तीन सेल हॉल उभारण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे. तर पार्किंगची योग्य सोय नसल्याने वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.