जुन्नर -गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या जम्बो आवर्तनामुळे माणिकडोह धरणातील साठा निम्म्याहून कमी झाला आहे. नगर, सोलापूर जिल्ह्यासाठी असलेले हे आवर्तन पुढील आठ-दहा दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे. मात्र एकाच आवर्तनात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असेल तर येत्यास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कसे नियोजन करायचे. पुन्हा पाण्याची मागणी झाल्यास जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरसे पाणी राहणार काघ असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात असून थोडं आम्हालाही पाणी राहूद्या, अशी आर्त साद त्यांनी घातली आहे.
पुन्हा पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध
या महिनाभराच्या आवर्तनामुळे धरण क्षेत्रातील गावांजवळील धरणाचे पाणी झपाट्याने पुढे जात असून येथील नागरिकांना तसेच पशुधनाला येत्या उन्हाळ्यात झळ बसण्याची शक्यता आहे. माणिकडोह धरणातील पाणीसाठ्याबाबतचा मागील दोन-तीन वर्षांचा अनुभव पाहता या धरणातील पाणीसाठा राखीव ठेवल्यास नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार नाही, असे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ह्या आवर्तनानंतर पुन्हा पाणी सोडण्यास शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध आहे.
कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणांतून एक जानेवारीपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एक जानेवारीला 87 टक्के उपयुक्तसाठा असलेल्या माणिकडोह धरणात आता केवळ 48.7 टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पातील हे आवर्तन प्रशासकीय नियोजनाप्रमाणे असून जुन्नर व परिसरातील गावांसाठी पिण्याचे पाणी जून अखेरपर्यंत शिल्लक राहणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. कुकडी प्रकल्पातील येणाऱ्या धरणांमध्ये गुरुवारअखेर (दि. 6) 66.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
कुकडी प्रकल्पातील माणिकडोह, पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे या धरणांमधून सोडलेले पाणी येडगाव धरणाच्या साठ्यात जमा होत असते. येथून पुढे नगर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाणी पुरविले जाते. गेल्या 38 दिवसांपासून या येडगाव धरणाच्या साठ्यांतून आवर्तन सुरू आहे. या धरणातून नगर, कर्जत, करमाळा आदी भागांसाठीचे आवर्तन पूर्ण झाले असून आता श्रीगोंदा येथील आवर्तनासाठी 1400 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.