सासवड शहरात अतिक्रमणे हटवली; मात्र, पालिकेसमोरच अडथळा
सासवड – सासवड शहरातील अतिक्रमणे हा कायमच चर्चेचा विषय ठरलेला आहे. काही दिवसांपूर्वी पुरंदर तहसीलदार रूपाली सरनौबत व नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली.
मात्र, या कारवाईचा फक्त फार्स केला गेला काय, असा सवाल आता सासवडकरांकडून विचारला जात आहे. कारण सध्या नगरपालिकेलाच अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.
नगरपालिकेच्या अगदी समोरच शिवतीर्थ चौकात व पुणे- पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर फळे, भाजीपाला, कुल्फी, आईस्क्रीम, आदी फेरवाल्यांनी दुकाने थाटली आहेत.
विशेष म्हणजे नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातच ज्या ठिकाणी अतिक्रमण थाटलेली आहेत. तेथेच नगरपालिकेने दुकाने लावण्यास बंदी असल्याचे फलक देखील लावलेला आहे. हा फलक निव्वळ शोपीस बनला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांचे अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे.
नगरपालिकेच्या समोरच्या अतिक्रमणांमुळे शहरातून जाणाऱ्या पुणे- पंढरपुर राष्ट्रीय पालखी महामार्गावर व शहरातील मुख्य शिवतीर्थ चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वसामान्य सासवडकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.