भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी; जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर
वाई, दि. 5 (प्रतिनिधी) – वाई तालुक्यात परतीच्या जोरदार पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अजून आलेले नाही. डोंगर पठारावरही पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र, ग्रामीण भागात भटकी जनावरे व रानडुकरे अन्नाच्या शोधात उभ्या पिकात घुसून प्रचंड नासाडी करत आहेत. ही जनावरे अरगड ज्वारीच्या कणसांसाठी संपूर्ण ताटे जमीनदोस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
वाईच्या पश्चिम भागासह तालुक्यात हजारो एकर जमिनीतील ज्वारीचे रानडुकरे व भटक्या प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे, असे ग्रामस्थांच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ज्वारी, भुईमुग, सूर्यफुल, कांदा, पावटा, वाटाणा, बाजरी यासारख्या निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना झळ बसत आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतात रानडुकरे घुसू नयेत म्हणून शेतकरी यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित आहेत. संपूर्ण शेताला साड्यांनी लपेटण्यात येत आहे किंवा आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येत आहेत. काही शेतकरी बांधांभोवती थायमेट घालत आहेत तर काही ठिकाणी रात्रभर शेकोट्या पेटवून खडा पहारा दिला जात आहे.
जनावरांना पिटाळण्यासाठी छऱ्याच्या बंदुकांचाही वापरण्यात येत आहे. त्यातूनही शेतकऱ्यांची नजर चुकवून जनावरे पिकात घुसून नासाडी करत आहेत. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.