विश्रांतवाडी – छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला, त्याचप्रमाणे अठरा पगड जाती, बारा बलुतेदार व बहुजन समाज एकत्र यायला पाहिजे, यासाठी माझा लढा आहे. सर्व समाजबांधव एकत्र नांदावेत हाच माझा दृष्टीकोन आहे, अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
प्रभाग क्र. 1 मध्ये नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या प्रयत्नातून पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वसंत क्रीडा संकुल, आनंद विहार बहुउद्देशीय सभागृह, जलतरण तलाव व बॅडमिंटन कोर्ट या वास्तूंचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीराजे बोलत होते.
यावेळी खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, भाजपचे विधानसभा अध्यक्ष संतोष खांदवे, भाजप बांधकाम व्यवासायिक आघाडीचे शहराध्यक्ष मोहनराव शिंदे-सरकार, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, ऍड. नानासाहेब नलावडे, नगरसेवक मारुती सांगडे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, शिवसेनेचे शहर संघटक नितीन भुजबळ, महेंद्र गलांडे, सोमेश्वर बालगुडे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याचे काम कर शकतात. हे नगरसेवक अनिल टिंगरे यांनी घेतलेल्या विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून दिसून आले. आज, टिंगरे यांना शाहू महाराज, शिवाजी महाराज या घरांन्याचा सन्मान करावयाचा असल्याने मला बोलविले असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक अनिल टिंगरे यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सादर केला. सूत्रसंचालन राजीव कुलकर्णी यांनी तर जगदीश देशपांडे यांनी आभार मानले.
भामाआसखेडचे श्रेय सर्वांचेच…
भामाआसखेड प्रकल्पाचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण झाले. पाणी पिणाऱ्याच्या आनंदात जो सहभागी होईल, त्याचे श्रेय मोठे, असे मी मानतो, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. प्रभाग 1 मधील विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात आजी, माजी आमदारांनी भामा आसखेड प्रकल्पावरून आपआपल्या भाषणात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. यावरून खासदार बापट यांनी वरील टिप्पणी केली. बापूसाहेब तुम्ही टाकी बांधली प्रकल्प आणला, जगदीश याने पाइपलाइन टाकली, त्यानंतर सुनिल आले त्याने तोटी बसविली आणि भांड घेऊन लोकांना पाणी पाजण्याचे काम तुम्ही सर्वांनीच केले असल्याचेही खासदार बापट यांनी सांगितले.
आजोबाने लावलेल्या झाडाचे
आजोबाने लावलेल्या झाडाची फळे नातवंडांना खायला मिळतात, असे सांगत भामाआसखेड प्रकल्पाबाबत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनीही मुद्दा छेडला. खराडी भागाला या प्रकल्पाचे पाणी मिळणार नसले तरी लोहगाव, धानोरी, कळस, येरवडा या भागाला भामाआसखेडचे पाणी मिळणार याचा आनंद आहे. खराडी भागातील नागरिकांनी अनेक हाल सोसले आहेत, त्यामुळे प्रकल्प सुरु झाला याचा आनंदच आहे. येरवडा भागाला पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर लष्कर पाणीपुरवठा केंद्राचे पाणी खराडी भागाला मिळणार आहे, याचेही समाधान आहे, असे माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी सांगितले.
आम्ही लहानपणीही विरोधी संघात…
भामाआसखेडचे पाणी मिळणार असल्याने लोहगाव, धानोरी येथील भागाचा विकास होईल, असा विश्वास आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला. अनिल आणि मी लहानपाणापासून विरोधी संघात खेळायचो. कधी तो जिंकायचा तर कधी मी. आताही, आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत, असे असले तरी आमच्यात कोणतेही वैचारिक आणि त्याहुनही राजकीय मतभेद नाहीत. मतदारसंघातील अनेक विषयांवर आम्ही चर्चा करतो, विकासकामांबाबत मुद्दा अडचणीचा वाटला तर एकमेकाची मदत घेतो, असे सांगत आमदार सुनील टिंगरे यांनी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्याबरोबरील राजकीय मैत्रीला उजाळा दिला.