ओतूर (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील हांडेबन चैतन्यनगर वस्तीमध्ये रविवारी (दि.28) रात्री गोठा मालक विलास शंकर देशमुख यांच्या मालकीच्या घराजवळील बंदिस्त ठेवलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात 12 शेळ्यांचा मृत्यू झाला तर 3 शेळ्या जखमी झाल्या आहेत.
ओतूर हद्दीत मेंगाळवाडी रोड, हांडेबन चैतन्यनगर वस्तीमध्ये देशमुख यांचा गोठा आहे. रात्री बिबट्याने गोठ्यावर चाल करीत शेळ्यांचा फडशा फाडला. हल्ला झाल्याची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या आठ शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. आणखी काही मृत शेळ्या शोधण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळी वनाधिकारी योगेश घोडके, वनपाल सचिन मोढवे, वनरक्षक एस. ए. राठोड, एस. जी. मोमीन, वनमजूर किसन केदार, फुलचंद खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, जुन्नर पंचायत समिती सभापती विशाल तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे यांनी भेट दिली. दरम्यान, जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित तालुका आहे. गेली काही दिवस बिबट्याचे हल्ले कमी झाले होते. मात्र, सध्या मानवी वस्तीवर हल्ले वाढले आहेत.
सध्या जुन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर वाढला असून काही अंशी घटले होते. मात्र ओतूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असल्याने ही बाब वनविभागाने लक्षात घेऊन ठिकाणी बिबट हल्ल्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.
-विशाल तांबे, सभापती, पंचायत समिती, जुन्नर
नीरावागजमध्ये शेळी, बोकडावर हल्ला
बारामती (प्रतिनिधी) – नीरावागज (ता. बारामती) येथील पन्हाळे वस्तीवरील शेतकऱ्याच्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि 28) रात्री घडली आहे. निरावागज परिसरात बिबट्याचा वावर असून गाव व वाड्या-वस्त्यांवर बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
पन्हाळे वस्ती येथील सोमनाथ पन्हाळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तर याबाबात खबर मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदन देवकाते, पोलीस पाटील अमित देवकाते, सरपंच यशवंत देवकाते, सरपंच यशवंत देवकाते, बाबू कारंडे, तुषार देवकाते, सुनील देवकात, वन विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सोमनाथ पन्हाळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, काटेवाडी येथे यापूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजऱ्याच्या साह्याने तीन बिबटे जेरबंद केले. त्यानंतर काटेवाडीकरांना दिलासा मिळाला होता. असे असले तरी नीरावागज परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला असून यापूर्वी देखील नीरावागज परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले होते.