जयेश राणे
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ. शिक्षण क्षेत्रातील काहीजणांच्या अयोग्य वर्तनामुळे सर्वांनाच त्याच नजरेने पाहिले जाऊ शकत नाही. मात्र, जे चुकीचे आहे, त्यावर प्रकाश टाकणे निकडीचे ठरते. शिक्षकी पेशाला छेद देत शिस्तीच्या मार्गावरून भरकटत बेशिस्तीच्या मुशीत किती खोलवर प्रवेश केला जातो. हे कळल्यावर आश्चर्य वाटते आणि विद्यार्थ्यांना शिस्त कशी लागणार? असा प्रश्नही पडतो.
चित्रपटातील एका गाण्यावर उत्तर प्रदेश राज्यातील एका शाळेतील शिक्षिकेने खोलीत नाच केला. या वेळी सहकारी शिक्षकांनी तिच्यावर पैशांची मुक्तपणे उधळणे केली. आग्रा जिल्ह्यातील एका शाळेतील ही संतापजनक घटना आहे. याविषयीचा व्हिडीओ सर्वत्र सोशल मीडियावर प्रसारित झाल्यावर नाच करणाऱ्या शिक्षिकेसह सहा शिक्षकांना फिरोजाबादच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याने निलंबित केले आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने 5 दिवसांचा निष्ठा कार्यक्रम 150 प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणातून शालेय शिक्षणाची क्षमता वाढवण्याचा उद्देश होता.
दुसऱ्या प्रकरणात राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील सायला उपखंड क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिक्षक, शिक्षिका नागीण नृत्य करत असल्याचे एका क्लिपमधून सर्वांसमोर आले. या प्रकरणातून लक्षात आले आहे की शिक्षणाची सूत्र चुकीच्या व्यक्तींच्या हाती होती. ज्यांचे स्वतःचे विचार बुरसटलेले आहेत ते विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार काय करणार? संस्कारांची खरी गरज कोणाला आहे? हे आता तरी वेगळे सांगायला नको. नाव आहे प्रशिक्षण शिबिर आणि आक्षेपार्ह नृत्य करून केवळ वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिले आहे. यांचे लक्ष शिबिरामध्ये असणे शक्य आहे का? म्हणजे यांच्यासाठी सरकारने खर्च केलेला पैसा वायाच गेला, असे का बोलू नये? निलंबन नव्हे तर यांना बडतर्फच केले पाहिजे.
समाज शिक्षकाकडे आदराने पाहात असतो. विद्यार्थी घडवण्याचे सेवाभावी कार्य करण्याची संधी त्यांना मिळालेली असते. मात्र, शिक्षक नागीण नृत्य करू लागले, बेभान होऊन नृत्य करू लागले, अन्य सहकारी शिक्षक नोटांची उधळण करू लागले, तर त्यांच्याकडून समाजाने कोणता आदर्श घ्यावा? आक्षेपार्ह नृत्य करून कोणता आदर्श समाजासमोर ठेवला आहे? यांना शिक्षक कसे म्हणावे? आपले शिक्षकच असे नृत्य करत आहेत, हे चित्र विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम करेल? संबंधित विभागाकडून अशांवर कारवाई झाली तरी आपण विद्यार्थ्यांना नजर तरी कशी मिळवणार? असा प्रश्न त्या शिक्षकांच्या मनात येईल का? याविषयी शंकाच आहे. कारण जे मुक्तपणे आक्षेपार्ह नृत्य करू शकतात ते किती निष्काळजी विचारसरणीचे असतील, हे लक्षात येते. यांना कोणत्या गोष्टीचे सोयरसुतक असणार?
शाळा-महाविद्यालये यात वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येत असते. त्यावेळी व्यासपीठ आणि सभागृह या दोन्ही ठिकाणी नाच चालू असल्याचे पाहण्यास मिळते. व्यासपीठावर कोणी नृत्य सादर करत असेल तर त्याच्यासह मुलींकडे पाहात अचकटविचकट हावभाव करत नाचणारे विद्यार्थी त्याच सभागृहाच्या मागील बाजूला पाहण्यास मिळतात. अशा वेळी हाणामारीच्या घटनाही घडत असतात. परिणामी वातावरण तणावग्रस्त बनते. नागीण डान्स करणारे शिक्षक आणि अचकटविचकट हावभाव करत नाचणारे विद्यार्थी यात काहीतरी फरक दिसतो का? मुळीच नाही. ज्या ठिकाणी स्वतः शिक्षकच आक्षेपार्ह वर्तन करतात तिथे विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होण्याच्या आशा धूळीस मिळतात.
शाळा-महाविद्यालये यात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा वेळी महिला शिक्षिकांना आपल्याला तोंड द्याव्या लागत असलेल्या प्रकरणाविषयी सांगावे असे विद्यार्थिनींना वाटू शकते आणि तसे वाटणे साहजिकच आहे. कारण त्यांच्याकडे मनमोकळे करू शकतो, अशी एक आशा असते. मैत्रिणींना सांगण्यात आले तरी नराधम संबंधित शाळा-महाविद्यालयातील असेल तर त्याविषयी शिक्षिकांना सांगणे आवश्यक ठरते. आता ज्या ठिकाणी महिला शिक्षिकाच आक्षेपार्ह वर्तन करण्यात व्यस्त असतील, त्यांचा आधार वाटणे शक्य आहे का?
अभ्यासासह विद्यार्थ्यांना उत्तम दिशा दर्शन करणारे शिक्षक असले पाहिजे. शिक्षक म्हणून त्या पदावर सेवारत असताना कसे वागले पाहिजे, बोलले पाहिजे. याविषयीच्या सूत्राला महत्त्व देणे किती अत्यावश्यक आहे, हे वरील प्रकरणांतून कळते. योग्य सूत्रांपेक्षा अयोग्य सूत्रांचे अवलोकन पटकन केले जाते. आपले शिक्षक आक्षेपार्ह वर्तन करतात, तर आपण त्यांच्यापेक्षा पुष्कळच लहान आहोत. आपण नागीण नृत्य केला तर काय होणार आहे? असा विचार कैक विद्यार्थ्यांच्या मनात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरतर अचकट-विचकट नृत्य अयोग्यच. स्वतःच स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यास उत्सुक असणारे या मार्गावर मार्गस्थ होतात. त्यामुळे योग्य काय, अयोग्य काय याची पारख करायला शिकणे, हे देखील शिक्षणासह अत्यावश्यक असणारे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे. याचा जीवनाच्या प्रत्येक वळणावर उपयोग होणार आहे.