नवी दिल्ली – करोनाने जगासह देशात अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे उद्योग व्यवसायापासून मनुष्याचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. करोनाच्या उद्रेकाने महासत्ता असलेल्या राष्ट्रांनाही नामोहरण केले आहे. पण त्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली असली तरी ती गंभीर आहे. एकीकडे जग करोनाचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. तर दुसरीकडे करोनावरील औषधासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी करोनावरील लस येण्यासाठी दोन वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने करोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. याप्रसंगी नाबारो यांनी भारताने करोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. भारतीय नागरिक करोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीने करोनाला बाजूला ठेवता येऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविषयी शिक्षित करणे हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असे नाबारो म्हणाले.
भारताने ज्या पद्धतीने करोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे. भारतातील रुग्णसंख्या दुप्पटीचा वेग 11 दिवसांचा आहे. हा कालावधी म्हणजे प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी चांगली संधी आहे, असे मत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केले.