नगर -नगरमधील टेनिस ग्रुप व क्रीडाई ग्रुप यांच्या पाठबळाने व सावलीच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या अन्नदान उपक्रमाचा आज समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांचे स्वीय सहायक सुरेश आघाव यांच्या संकल्पेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 30 मार्चला या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.
दररोज तीन पोळी व भाजीच्या 300 पाकीटाचे वितरण सावलीच्या माध्यमातून करण्यात आले. ज्यांच्या घरात अन्नाचा कण नाही, अशा कुटुंबांना 31 दिवस सातत्याने अन्न पाकिटे देण्यात आली. दोन पाकीटात घरातील 4 लोकांचे जेवण, या प्रमाणे रोज सरासरी 1200 व्यक्तींना पुरेसं भोजन पुरविण्यात आले.
सावलीच्या माध्यमातून निराधार मुलांना हक्काचं घर गेली 20 वर्षापासून कार्यरत आहे. अनेक संकटाना तोंड देत अनेक निराधारांना चांगले नागरिक बनविण्याचे कार्य केले आहे.
सध्याच्या करोना संकट काळात परिस्थितीचे भान राखून “सावलीची हाक, घासतील घास’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत भूषण नगर केडगाव परिसरात असलेल्या मजुर, भंगार गोळा करणारे, बांधकाम मजूर, विधवा, वृध्द व्यक्तिना किराणा साहित्य देण्याची सुरुवात 30 मार्च रोजी 50 कुटुंबापासून देऊन झाली. विजय उमाप, क्रीडाईचे अध्यक्ष नितीन गुगळे, सुभाष पठारे, राजेंद्र अडेप यावेळी उपस्थित होते.