पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते आहेत. त्यांना या चिलखातून बाहेर कसे पडायचे, याची त्यांना नक्कीच बुद्धी आहे, अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पुण्यात केली.
आमदार पवार गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदांमधून राज्यातील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत टीका करत आहेत. त्याचा रोख विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांवर आहे. पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवार बालवाडीचे अध्यक्ष असल्याची टीका आमदार पवार यांच्यावर केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार यांनी तटकरे यांना लक्ष्य केले.
रोहित पवार म्हणाले, की मी त्यांच्यापेक्षा लहान असल्याने सुनील तटकरे मला बालवाडीचे अध्यक्ष म्हणत असतील; पण ते सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते आहेत. मात्र, त्यांनी एका घराच्या पत्त्यावर शंभर कंपन्या कशा? याचे उत्तर द्यावे. भाजपमध्ये जाऊन स्वतःवरील कारवाया थांबवायच्या हे त्यांना माहिती आहे.
तटकरे यांनी अंतुले, देशमुख यांना सोडले. शरद पवार यांनाही सोडले. आज दादांबरोबर असले, तरी उद्या भाजपमध्ये जाणारेही तेच पहिले नेते असतील. विचार व पक्ष सोडण्याची त्यांच्याइतकी बुद्धी मला नक्कीच नाही, अशी खोचक टीकाही पवार यांनी तटकरे यांच्यावर केली.
पुन्हा भावनिक राजकारण
बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून भावनिक राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा याच विषयावरून भाजपवर टीका केली आहे. भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे. कुटुंबातील लोकांचा वापर करून भाजप शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.