पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाषा ही अडाण्याची असते आणि तेच भाषेला जतन करण्याचे काम करतात, असे मत लेखक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केले. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश घेऊन उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांनीच मराठी भाषेचा त्याग केला आहे, अशी खंत बोकील यांनी व्यक्त केली. साधना साप्ताहिक आणि ग्रंथसखा वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ भाषा आणि संस्कृती विश्वनाथ खैरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाषाविज्ञानाचे अभ्यासक मिलिंद मालशे, खैरे यांच्या कन्या प्रज्ञा खैरे-पाटील, मुक्ती खैरे, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ आणि वाचनालयाचे श्याम जोशी या वेळी उपस्थित होते. खैरे यांची काही पुस्तके किंडलवरही वाचता येणार असून, त्याचे प्रकाशनही मालशे यांच्या हस्ते करण्यात आले. बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयामध्ये विश्वनाथ खैरे आभासी अध्यासन सुरू करण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
मराठी आणि तमिळ या दोन भाषा एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत, हे खैरे यांनी द्रविड महाराष्ट्र या पुस्तकातून सांगितले आहे. भाषांचा तुलनात्मक शोध अन्य भाषांमध्ये घेतला, तर सगळ्या भाषांची कुळे शोधणे शक्य होईल. राजनीतीच्या दृष्टिकोनातून संस्कृतकडे पाहण्याची घातक वृत्ती वाढत आहे. २०४७ पर्यंत संस्कृत प्रधान भाषा करण्याचे वक्तव्य राज्यपालांनी केले. त्याचा मुकाबला करण्यासाठी खैरे यांच्या साहित्याचा उपयोग होऊ शकेल, असे बोकीलही म्हणाले.
संस्कृतमधून अन्य भाषांचा जन्म झाला, हे भाषविज्ञानाचे अभ्यासक मान्य करत नाहीत. संस्कृत आणि प्राकृत एकाच वेळी अस्तित्वात होत्या. या भाषांसंदर्भात आपणच श्रेष्ठ- कनिष्ठ या संकल्पना जोडल्या. खैरै यांच्या ‘संमत’ (संस्कृत, मराठी, तमिळ) पुस्तकाच्या आधारे लोकभाषा, लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा अभ्यास करून युवा अभ्यासकांनी नवा सिद्धांत मांडून पूर्ण अंधारातून कवडसे शोधण्याची आवश्यकता आहे, असे मालशे यांनी नमूद केले.
भाषा शिकण्यासाठी विद्यापीठांत जाण्याची गरज नाही. सामान्य माणूस आपल्या पातळीवर भाषा जतनाचे काम करू शकतो. आभासी अध्यासनामध्ये सर्व शाखांचा मिळून अभ्यास व्हावा आणि समाजाला एकत्र आणणारे संशोधन पुढे न्यावे. लेखक म्हणून माझ्या जडणघडणीमध्ये डाॅ. सुरेंद्र बारलिंगे, मे. पुं. रेगे यांच्यासह साधना साप्ताहिकाचे महत्त्वाचे योगदान आहे. – मिलिंद बोकील