मुंबई : सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून वेगळेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळावा आणि त्यानंतरच्या ठाण्यातील उत्तर सभेत सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम दिले आहे.त्यांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच राज यांची समजूत काढण्याची विनंती केली आहे.
साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी, “राज ठाकरेंचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केली आहे. तसेच “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” असे आवाहन केले आहे. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे,” अस इशाराही लक्ष्मण मानेंनी दिला आहे.
“राज्य सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय आहे?”, अशा शब्दांमध्ये लक्ष्मण मानेंनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. “ज्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी सर्वसामान्यांना फसवण्याचा धंदा बंद करावा. कारण हिंदू राष्ट्रासाठी गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य, भटके, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, यहुदी, लिंगायत, जैन या जातीच्या लोकांना हिंदू राष्ट्र हवे आहे का?” असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला.
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींचा अभ्यास करुन समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केलं. त्यावर आक्रम करुन भाजपाने देशात आणि राज्यामध्ये धुडगूस घातलाय,” असा टोला माने यांनी लगावला. राज ठाकरेंनी केलेली मागणी आणि भाजपाकडून होत असणाऱ्या संविधानावरील आक्रमणाचा निषेध करत असल्याचं सांगत, “राज ठाकरेंनी केवळ ठाकरे घरण्यात जन्म घेतलाय. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीमधील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्श वर वारसा राज ठाकरेनी घ्यावा,” असंही माने म्हणालेत.
“मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही तलवारी काढू, हे राज ठाकरेंचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे असं वक्तव्य करणं हा फौजदारी गुन्हा आहे. म्हणूनच पोलिसांनी तात्काळ त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी माने यांनी केलीय. पुढे बोलताना माने यांनी, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्यांनी आपल्या भावाची (राज ठाकरेंची) समजून काढावी. नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख या नात्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. याबद्दल मी स्वत: पत्र लिहून तशी विनंती करणार आहे. राज कोणाची तरी सुपारी घेऊन काम करतायत,” असंही म्हटलं.
माने यांनी पुढे बोलताना ‘आम्ही भारतीय लोक’ नावाचं अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार असल्याचं स्पष्ट केलंय. या अभियानाला २९ एप्रिलपासून सकाळी ११ वाजल्यापासून साताऱ्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावरुन एक दिवसीय उपोषण केलं जाणार आहे, असं सांगितलं. “माझ्यावर हल्ला झाला तरी चालेल पण कोणीतरी या बेबंदशाहीला विरोध करायला हवा म्हणून मी या संघर्षात उतरत आहे, असंही माने म्हणाले.