नगर – शहरातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्याच्या हेतूने नागरिकांना बोलते करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने “स्पीक अहमदनगर स्पीक’ ही मोहिम सुरु करण्यात आली. यावेळी बंद नळासमोर पालथी घागर ठेऊन शहराची अमृतपाणी योजना बारगळल्याचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, वीर बहादूर प्रजापती, सुहास मुळे आदिंसह विविध स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेबीनारच्या माध्यमातून सहभागी झाले होते. शहराच्या प्रश्नावर नागरिक बोलत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींवर दबाव येत नाही. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना बोलते करुन, प्रश्न मार्गी लावण्याचा संघटनेचा मानस आहे.
शहरासाठी असलेली कोट्यावधी रुपयाची अमृतपाणी योजना बारगळली. यामध्ये टक्केवारीचा भ्रष्टाचार होऊन ठेकेदार पळून गेला. नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळविण्यास जबाबदार असणाऱ्या लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी भ्रष्टभज्ञाकची उपाधी देऊन निषेध नोंदविण्यात आला, असल्याचे ऍड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.