मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अमित देशमुख यांनी आता या चर्चांवर भाष्य केले आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या विधानामुळे देशमुख भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना देखील बळ मिळाले होते. परंतु अमित देशमुख यांनी एका सभेदरम्यान आता या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
“कितीही वादळ आली तरी लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार” असं अमित देशमुख यावेळी म्हणाले. तसेच अडीच वर्षात तीन सरकार बदलली चौथ काडीही येऊ शकत अशी शक्यता देखील देशमुख यांनी यावेळी वर्तवली. “मला तुम्ही तुमच्या घरी या म्हणताय,पण तुम्ही स्वगृही या असं मी म्हणालो तर ते जास्त संयुक्तिक ठरेल” असं सूचक वक्तव्य देखील अमित देशमुख यांनी यावेळी केले.
“कितीही वादळं आली, किती वारे आले तरी वाडा तो तिथेच होतो आणि पुढे कितीही वादळ आली तरी लातूरता देशमुख वाडा तिथेच राहणार” अस अमित देशमुख यांनी ठणकावून सांगितलं. अमित देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा या आधी देखील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. यावेळी देखील देशमुख यांनी आपल्या खास शैलीत अशा चर्चांचा समाचार घेतल्याचे दिसून आले.
काय म्हणाले होते संभाजी पाटील निलंगेकर
“लातूरच्या जनतेला ज्यावेळी ऑक्सिजन लागत होता. त्यावेळी लातूरचे प्रिन्स हे लातूरला नव्हते. आज भाजपमध्ये यायचं म्हणतात. कशासाठी? कुठंतरी आपल्याला सत्तेत राहायचं यासाठी यायचं म्हणतात”, असं विधान निलंगेकर यांनी केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा अमित देशमुख आणि भाजपच्या चहरचा सुरु झाल्या होत्या.