पाटणा – केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात आज बिहार मध्येही राजधानी पाटण्यात हजारो शेतकऱ्यांनी राजभवनावर मोर्चा आयोंजित केला होता. पण त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून रोखले. यावेळी निदशर्कांवर मोठ्या प्रमाणात लाठीहल्ला करण्यात आला. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
हा मोर्चा गांधीमैदानापासून सुरू होंणार होता. पण पोलिसांनी शेतकऱ्यांना गांधी मैदानात जाऊच दिले नाही. त्यावेळी निदर्शक आणि पोलिसांत झटापट झाली. त्यानंतर निदर्शक डाक बंगला चौकात पोहचले. तेथून राजभवन केवळ दीड किमी लांब असल्याने पोलिसांनी जादा कुमक मागवून शेतकऱ्यांना तेथेच रोखले.
यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठी हल्ला करण्यात आला. या निदर्शने व मोर्चासाठी बिहारच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. या मोर्चाला डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होंता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटण्याच्या सर्व भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.