हैदराबाद – देशात डिसेंबर 2020 पर्यंत करोनाच्या अँटीबॉडीज तपासणाऱ्यांपैकी एक तृतीयांश जणांना करोनाची लागण होऊन गेली आहे, असे 12 शहरात राबवलेल्या कोविड 19च्या सेरॉलॉजी सर्वेक्षणाच्या लेखापरीक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे देशातील एक तृतीयांश नागरिकांना करोना होऊन गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
देशभरात दुसऱ्या लाटेनंतरची सेरोपॉझिटिव्हिटी ही 31 टक्क्यांपेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे. कारण या काळात बाधित रुग्णांची संख्या सहापट अधिक होती. हे लेखापरीक्षण खासगी लॅबोरेटरीमध्ये गोळा केलेल्या चार लाख 40 हजार नमुण्यांच्या आधारे करण्यात आले आहे. यात विशाखापट्टणममध्ये 33.8 टक्के नमुन्यांमध्ये ऍटिबॉडीज असल्याचे आढळून आले आहे.
देशातील महत्वाच्या राज्यात स्वत:हून चाचणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये करोनाच्या सेरो पॉझिटिव्हिटी दर अधिक होता. करोनाचे बळी आणि नागरिकांमधून विनानिवडता घेतलेल्या चाचण्यांशी हे प्रमाण जुळणारे आहे, असे हा अभ्यास करणाऱ्या कॅनडातील टोरॅंटो विद्यापीठाचे सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चच्या संशोधकांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशांत 2200 केंद्रामध्ये गोळा केलेल्या केंद्रावर स्वत:हून चाचणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये 31 टक्के जणांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या आहेत. महिलांमध्ये ऍटीबॉटीज सापडण्याचे प्रमाण (35 टक्के) हे पुरूषांपेक्षा अधिक आहे. लहानपणी लसीकरण झालेल्यांमध्ये सेरोपॉझिटिव्हटी प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी याबाबत ट्विटची मालिका करून त्याची माहिती दिली आहे.ते म्हणतात, हे नमुने स्वत:हून तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे आहेत. त्यामुळे ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक वरच्या गटातील आहेत. या साथीत प्रत्येक शहरात “पिक’ वेगवेगळ्या काळात आला. दिल्लीत तो जून आणि डिसेंबरमध्ये आला. तर चेन्नईत जुलैमध्ये तर पुण्यात सप्टेंबरमध्ये आला.
ते म्हणाले, साधराणत: पिक सप्टेंबरच्या मध्यात आला. सेरोपॉझिटिव्हिटीमध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 69 टक्के प्रमाण आढळले आहे. या 12 शहरांतच देशातील एक तृतीयांश बाधित होते. त्यात आपण आलेया अधिक विस्तृत अशा दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या मिसळली तर करोनाची बाधा होऊन गेलेल्यांची संख्या 31 टक्क्यापेक्षा निश्चितच अधिक असेल. 2021 मध्ये आलेली दुसरी लाट अधिक व्यापक आहे.
देशातील 77 टक्के घरे ही दोन खोल्या किंवा त्यापेक्षा कमी अकाराची असतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे पाळणे शक्य नसते. त्यामुळे संसर्गक्षमता वाढते. असा स्थितीत करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 90 टक्क्यापेक्षा अधिक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.