पुणे, दि. 20 -मध्य रेल्वेचा “मेगा ब्लॉक’ मुळे रविवारी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्वच रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे प्रवाशांचा पुढील प्रवास सुखकर झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. तसेच दोन्ही प्रशासनांचे आभार मानले.
मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मस्जित बंदर दरम्यान असलेला कर्णाक पूल पाडण्यासाठी रेल्वेने 27 तासांचा “मेगा ब्लॉक’ घेतला होता. ब्लॉकदरम्यान मुंबईतून सुटून पुण्यामार्गे धावणाऱ्या 36 रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही रेल्वे पुण्यापर्यंतच धावणार होत्या. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने पुणे स्टेशन येथून 40 जादा बस सोडण्याचे नियोजन केले होते. पण, रेल्वे प्रशासनाने विविध माध्यमातून रेल्वे बंद असल्याचे सांगितले असल्याने प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी केवळ सहा ते सात एसटी बस जादाच्या सोडण्यात आल्या. तसेच नेहमीच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुटणाऱ्या 45 ते 50 बसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता.
रात्रभर सेवा
रेल्वे स्टेशनवर रविवारी गर्दी कमी दिसून येत होती. पुण्यापर्यंत येणारे प्रवासी मदत कक्षात चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना सर्व माहिती दिली जात होती. तसेच, पुणे स्टेशन येथे एसटीने अतिरिक्त बस सुरू केल्याचे सांगितले जात होते. पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकावर आल्यानंतर तेथे मुंबईसाठी बस उभ्या केल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या सोईसाठी एसटीचे अधिकारी त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना मदत करताना दिसून आले. रेल्वे व एसटीचे अधिकारी शनिवारी रात्रभर प्रवाशांच्या सोईसाठी तैनात केले होते.
पूल पाडण्याचे काम वेळेआधीच पूर्ण
मध्य रेल्वेने 27 तासांच्या ब्लॉक दरम्यान कर्नाक पूल तोडण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. 19 नोव्हेंबर रात्री 11 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा/वडाळा स्थानकांदरम्यान सर्व सहा लाईन, सातवी लाईन आणि यार्डवर बंद ठेवण्यात आल्या होत्या. कर्नाक पूल पाडल्यानंतर अप आणि डाउन धिम्या मार्गावर आणि अप आणि डाउन जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक नियोजित वेळेपूर्वी पूर्ववत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून दुपारी 3 वाजून 50 मिनटांनी पहिली लोकल ठाण्याकरीता मार्गस्थ झाली. तसेच लवकरच सर्व मार्गावरील रेल्वे पूर्ववत करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने हे एक मोठे आणि आव्हानात्मक काम होते. नाविन्यपूर्ण योजना, सूक्ष्म नियोजन आणि स्थानीय नागरी संस्थांशी योग्य समन्वय यामुळे आम्हाला हे काम नियोजित वेळेआधी पूर्ण करता आले. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकचा उपयोग इतर कामांसाठी देखील करण्यात आला.
-अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
रेल्वेचा ब्लॉक असल्यामुळे शनिवारपासूनच एसटीने तयारी केली होती. मुंबईसाठी अतिरिक्त बसचे नियोजन केले होते. रात्रभर मी स्वतः व एसटीचे वरिष्ठ अधिकारी स्थानकावर हजर होते. रात्री एक गाडी आल्यानंतर मुंबईसाठी अतिरिक्त गाडी सोडण्यात आली. दिवसभरासाठी देखील अतिरिक्त गाड्या ठेवण्यात आल्या होत्या.
– सुनील पाटील, आगार प्रमुख, पुणे