सातारा -जिल्हा रुग्णालयाला रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयाने तब्बल 15 हजार इंजेक्शनची मागणी “मायलान’ कंपनीकडे नोंदवली असून त्या तुलनेत इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात करोना रुग्णांची परवड होण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कंपनीच्या भिवंडी येथील वितरकाशी संपर्क साधला असून जास्तीत जास्त इंजेक्शनचा साठा साताऱ्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 37300 झाली असून प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांची एकूण संख्या 9 हजारांहून अधिक आहे. करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1140 वर पोहचली आहे. बाधित रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या दहा टक्के असल्याने दिवसाला वीस इंजेक्शनची गरज पडत आहे. मात्र, दाखल रुग्णांच्या संख्येत उपलब्ध लसींचे प्रमाण खूपच कमी असल्याने रेमडेसीवीरचा पुरवठा अत्यावश्यक बनला आहे.
जिल्ह्यात अठरा करोना केअर सेंटर असून जिल्हा रुग्णालयासह त्यांना आतापर्यंत 5221 लसींचे वितरण जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. त्या इंजेक्शनचे एक कोटी रुपये नुकतेच उत्पादक कंपनीला अदा करण्यात आले आहेत. मात्र, रेमडेसीवीरच्या उत्पादक कंपनीने लसीच्या टंचाईचे कारण पुढे केले आहे. उत्पादक कंपनीच्या उत्पादनावर लसीमधील कच्च्या घटकांच्या अनुपलब्धतेमुळे मर्यादा आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शासनाला पाच हजार इंजेक्शन व अनुषांगिक खर्चासाठी 87 कोटी रुपये मागितले होते. मात्र, पुणे विभागासाठी केवळ 4500 इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत.
त्यात साताऱ्याच्या वाट्याला केवळ नऊशे इंजेक्शन वाट्याला येऊ शकतात. हे प्रमाण पुरेसे नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु आहे. जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल्सच्या इंजेक्शनचा ऐंशी लाखांचा हिशोब प्रशासनाला मिळालेला नाही. रेमडेसीवीर लशीची शासकीय किंमत 2812 रुपये असून या दरानेच पंधरा हजार इंजेक्शनची मागणी करण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
कच्च्या मालाअभावी वाढल्या अडचणी
रेमडेसीवीर इंजेक्शन उत्पादक मायलान कंपनीने जिल्हा रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे पहिल्या टप्प्यात तीन हजार इंजेक्शन देण्याचे कबूल केले आहे. मात्र, इंजेक्शन ड्रग कंटेटचा कच्चा माल युरोप खंड व चीनमधून येत असून चीनने फार्मास्युटिकल्स उत्पादनावर तीस टकके निर्यात कर वाढवल्याने उत्पादक बहुराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाची अडचण झाली आहे. त्याचाच परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील रेमडेसीवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावर झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.